फिरकीपटू अश्विन चतुर गोलंदाज, लक्ष्मणने उलगडलं यशाचे रहस्य

| Updated on: Mar 02, 2021 | 5:32 PM

अश्विनने नुकताच कसोटीत 400 विकेट्स घेण्याचा भीम पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे.

फिरकीपटू अश्विन चतुर गोलंदाज, लक्ष्मणने उलगडलं यशाचे रहस्य
अश्विनने नुकताच कसोटीत 400 विकेट्स घेण्याचा भीम पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे.
Follow us on

मुंबई : सध्या टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. या कसोटी सीरिजमध्ये फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच तो बोलिंगसह बॅटिंगनेही जलवा दाखवत आहे. अश्विनने आतापर्यंत या मालिकेतील 3 सामन्यात एकूण 27 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या या यशाचं रहस्य व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणने (VVS Laxman) सांगितलं आहे. तसेच त्याने त्याचं कौतुकही केलं आहे. तो स्टार स्पोर्ट्स या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस तो बोलत होता. (team india former batsman vvs laxman praised r ashwin)

लक्ष्मण काय म्हणाला?

“अश्विन हा फार समजदार आणि चतुर गोलंदाज आहे, असं म्हणत लक्ष्मनने त्याचं कौतुक केलं. तसेच जेव्हा एखादा खेळाडू हा आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतो तेव्हा फक्त त्याच्यात असलेलं कौशल्य तसेच त्याने केलेली तयारी आणि वेळेनुसार स्वीकारलेला बदलही महत्वाचा ठरतो”, असं लक्ष्मणने नमूद केलं.

अश्विन पूर्वतयारीने मैदानात उतरतो : लक्ष्मण

“अश्विन प्रत्येक सामन्याआधी जोरदार सराव करुन पूर्व तयारीने मैदानात उतरतो. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची कमकुवत बाजू तो जाणून घेतो. यावर तो मेहनत करतो. त्यानुसार रणनिती ठरवतो. त्यानुसार अश्विन काम करतो. यामुळे अश्विन हा इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा ठरतो. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला आपल्या फिरकीत बांधून ठेवलं होतं”. त्याच्या या दौऱ्यातील कामगिरीचं उदाहरण देत लक्ष्मणने त्याचं वेगळेपण नमूद केलं.

अश्विनच्या 400 विकेट्स

अश्विनने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला आऊट करत 400 विकेट्स पूर्ण केल्या. यासह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 400 विकेट्स घेणारा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला. अश्विनने ही कामगिरी 77 व्या कसोटी सामन्यात केली. कसोटीमध्ये वेगवान 400 विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीथरनच्या नावे आहे. मुरलीने एकूण 72 टेस्ट मॅचमध्ये ही कामगिरी केली होती. तसेच अश्विन टीम इंडियाकडून 400 बळींचा टप्पा ओलांडणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियाकडून आतापर्यंत अनिल कुंबळे, कपिल देव हरभजन सिंह आणि आता अश्विने ही कामगिरी केली आहे.

आयसीसीकडून नामांकन

अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळे त्याला आयसीसीकडून फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कासाठीचे नामांकन मिळाले आहे. अश्विनला हा पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

ICC Player of the Month Award | आयसीसीकडून 3 खेळाडूंना नामांकन, इंग्लंड विरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विनही स्पर्धेत

India vs England, 2nd Test | दमदार शतक, शानदार रेकॉर्ड, अश्विनची विक्रमाला गवसणी

(team india former batsman vvs laxman praised r ashwin)