
T20 World Cup 2026 : टीम इंडियाने रविवारी टी20 वर्ल्ड कप 2026 वर आपलं नाव कोरलं. भारतीय टीमने फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी हरवलं. फायनलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह आणि प्लेयर ऑफ द सीरीज संजू सॅमसन ठरला. टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात अजून एका दिग्गजाची महत्वाची भूमिका आहे. तो टीमचा कोच नाहीय, खेळाडू नाहीय किंवा टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये सुद्धा नाहीय. पण या दिग्गजाने आपल्या निर्णयांनी भारतीय टीमला एकदा, दोनदा नाही, तर तीनदा आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली आहे. हे दिग्गज म्हणजे टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर. आपल्या कठोर निर्णयांमुळे त्यांना मीडिया आणि सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला. मात्र, तरीही ते आपल्या निर्णयावरुन डगमगले नाहीत. त्यांच्या अचूक सिलेक्शनमुळेच टीम इंडिया तीनदा वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे.
चीफ सिलेक्टर म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ 4 जुलै 2023 रोजी सुरु झाला. त्यांनी आपल्या कार्यकाळात साहसी आणि प्रभावी निर्णय घेतले. त्यामुळे भारताला व्हाइट बॉल फॉर्मेटमध्ये जबरदस्त यश मिळालं. अजित आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीने तीन आयसीसी टुर्नामेंट जिंकल्या.
2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून टी20 वर्ल्ड कप जिंकला.
मार्च 2025 मध्ये फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
8 मार्च रोजी भारताने न्यूझीलंडला हरवून टी20 वर्ल्ड कप जिंकला.
त्यांचे कुठले तीन निर्णय टर्निंग पॉइंट ठरले?
अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादवला टी20 टीमचा कॅप्टन बनवलं. त्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला. कारण क्रिकेट फॅन्स आणि दुसऱ्या क्रिकेट एक्सपर्ट्सच्या मते हार्दिक पंड्याला कर्णधार बनवायला पाहिजे होतं. अजित आगरकर यांचा सूर्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय योग्य ठरला. टीम इंडिया आज चॅम्पियन बनली आहे.
रोहित शर्माला वनडे टीमच्या कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय सुद्धा अजित आगरकर यांचा होता. हा निर्णय यासाठी मोठा आहे, कारण रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर तात्काळ हा निर्णय घेतला. शुबमन गिलला टीम इंडियाचं कॅप्टन बनवण्यात आलं.
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी इशान किशनची टीममध्ये निवड करण्याचा त्यांचा निर्णयही मास्टरस्ट्रोक ठरला. इशानने हा निर्णय योग्य ठरवत टी20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं.
अजित आगरकर यांच्या कार्यकाळातच टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पोहोचली. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. ती टुर्नामेंट टीम इंडियाने जिंकली असती तर अजित आगरकर यांच्या खात्यावर अजून एका यशाची नोंद झाली असती. त्यांनी खेळाडू म्हणूनही भारतीय क्रिकेटमध्ये मोठं योगदान दिलय.