Vinod Kambli : कांबळीकडे पाहून वाईट वाटतं, पण त्याच्या या अवस्थेला कोण जबाबदार? सचिनसोबत मैत्रीत दुरावा कधी आला?
Vinod Kambli : नुकतच रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच अनावरण झालं. या कार्यक्रमातील सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या भेटीला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ खूप भावनिक करणारा आहे. विनोद कांबळीची स्थिती पाहून अनेकांना वाईट वाटलं. पण कांबळीची ही हालत का झाली?

नुकतच मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच अनावरण झालं. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीसह त्यांनी घडवलेले नामवंत क्रिकेटर्स उपस्थित होते. या कार्यक्रमात असं एक दृश्य पहायला मिळालं, जे पाहून सगळेच आतून हेलावले. टीव्हीवर सुद्धा हे दृश्य पाहून अनेकांना वाईट वाटलं. हे दृश्य होतं, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची भेट. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही मुंबई क्रिकेटमधील हिट जोडी. शालेय जीवनापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत दोघे एकत्र क्रिकेट खेळले. शालेय क्रिकेटमध्ये त्यावेळी या जोडीने अनेक विक्रम रचले. क्रिकेटच्या मैदानात करियरच्या एका टप्प्यावर सचिन तेंडुलकर खूप पुढे निघून गेला, आणि विनोद कांबळी मागे पडला.
शिवाजी पार्कवर त्या दिवशी कार्यक्रमात जेव्हा सचिन कांबळीला भेटायला गेला, त्यावेळी कांबळीने आपल्या बालपणीच्या मित्राचा हात पकडला. कांबळी हात सोडायला तयार नव्हता. त्यावेळी जवळ असलेल्या एका माणसाने कांबळीला समजावलं. मग, सचिन आपल्या आसनावर जाऊन बसला. विनोद कांबळीची ती अवस्था बघून अनेकांना वाईट वाटलं. विनोद कांबळी सुद्धा सचिन इतकाच टॅलेंटेड होता, पण आज कांबळीची स्थिती पाहून अनेकजण हळहळतात. आज वयाच्या 52 व्या वर्षी कांबळीचा क्रिकेटशी काही संबंध राहिलेला नाही. प्रकृती त्याला साथ देत नाहीय.
यश पचवात आलं पाहिजे
विनोद कांबळी आज धड चालू शकत नाही, बोलू शकत नाही. त्याला आधाराची गरज लागते. त्याची मानसिक स्थिती खराब असल्याच बोललं जातं. कांबळीची आज आर्थिक स्थिती सुद्धा अशी नाही की, तो स्वत:वर चांगले उपचार घेऊ शकेल. माणसाकडे नुसतं टॅलेंट असून भागत नाही, त्या टॅलेंटला सराव, विनम्रता, संयमाची जोड लागते. म्हणून सचिन या शर्यतीत पुढे निघून गेला, कांबळी मागे राहिला. तुम्हाला नाव, प्रसिद्धी, यश मिळतं, तेव्हा ते पचवता सुद्धा आलं पाहिजे. विनोद कांबळीच क्रिकेट करिअर उतरणीला लागलेल असताना तो अन्य गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असायचा.
सचिन सोबतच्या मैत्रीमध्ये अंतर कधी आलं?
विनोद कांबळी नाइट क्लबमध्ये पार्टी, नाच-गाण्यांचा तो शौकीन होता. दारुच्या व्यसनाचा सुद्धा कांबळीच करिअर संपवण्यात महत्त्वाचा रोल आहे. 2009 साली ‘सच का सामना’ या रियलिटी शो मध्ये त्याने BCCI वर पक्षपातीपणाचा आरोप केला. 1996 च्या वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कांबळी त्या कार्यक्रमात असही म्हणाला की, “जेव्हा तो करिअरमध्ये अडचणीत होता, तेव्हा सचिन तेंडुलकरने त्याची मदत केली नाही” याच कार्यक्रमानंतर सचिन आणि त्याच्या मैत्रीमध्ये अंतर वाढल्याच बोललं जातं. विनोद कांबळीची आज जी अवस्था आहे, त्याला तो जबाबदार आहे.
