जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
देशातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना' आणली आहे. या योजनेसाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, याद्वारे जलाशय आणि तलावांवर तरंगणारे सोलर पॅनेल बसवले जातील.

भारतात सौर ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत असून आता पाण्यावर सोलर पॅनेल तरंगताना दिसणार आहेत. या विशेष तंत्रज्ञानामुळे विजेचे उत्पादन तर वाढेलच, शिवाय पाण्याचे वाष्पीकरणही रोखता येईल. रात्रीच्या वेळी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यामध्ये दोन तासांचा विशेष बॅटरी बॅकअप देखील दिला जाणार आहे. भारतात दरवर्षी उन्हाळ्यात आणि सणासुदीच्या काळात विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचत आहे. ही वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आणि कोळशावर आधारित वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.
केंद्र सरकार आता देशातील मोठ्या जलाशयांच्या आणि झीलांच्या पृष्ठभागावर तरंगणारे सोलर पॅनेल बसवण्याच्या मेगा प्लॅनवर काम करत आहे. या क्रांतिकारी योजनेला ‘प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना’ असे नाव देण्यात आले असून, यासाठी सरकारने तब्बल 5,070 कोटी रुपयांच्या भरीव बजेटची तरतूद केली आहे.
पाण्यावर सोलर पॅनेल कसे काम करणार?
ज्याप्रमाणे जमिनीवर सोलर पॅनेल लावून सूर्यकिरणांपासून वीज तयार केली जाते, अगदी त्याच तंत्रज्ञानाचा वापर येथेही केला जाईल. मात्र, हे पॅनेल जमिनीऐवजी पाण्यात तरंगणाऱ्या विशेष प्लॅटफॉर्मवर घट्ट बसवले जातील. जेव्हा सूर्यप्रकाश या पॅनेल्सवर पडेल, तेव्हा त्यांची सौर खेचण्याची क्षमता सुरू होईल आणि निर्माण झालेली वीज इन्व्हर्टरच्या माध्यमातून ग्रीडपर्यंत पोहोचवली जाईल.
भारतासाठी गेमचेंजर का? (2 ते 8 टक्के जास्त वीज निर्मिती)
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या तांत्रिक विश्लेषणानुसार, ही योजना भारतासाठी खालील कारणांमुळे गेमचेंजर ठरणार आहे: जमिनीची बचत: भारतात सौर ऊर्जेसाठी हजारो एकर जमीन संपादित करणे हे मोठे आव्हान आहे. पाण्यावर प्लांट उभारल्यामुळे जमिनीची मोठी बचत होईल. कूलिंग इफेक्ट: जमिनीवरील सोलर पॅनेल अतिउष्णतेमुळे गरम होतात, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. मात्र, पाण्यावर असल्यामुळे खालच्या पाण्याच्या थंडाव्याने पॅनेलचे तापमान नियंत्रित राहते. यामुळे जमिनीवरील प्लांटच्या तुलनेत हे 2 ते 8 टक्के अधिक वीज निर्मिती करतात. पाण्याचे वाष्पीकरण रोखणार: हे पॅनेल पाण्याचा पृष्ठभाग झाकून टाकत असल्यामुळे कडक उन्हात पाण्याचे बाष्पीभवन कमालीचे कमी होईल, ज्यामुळे धरणांमधील पाणी जास्त काळ टिकून राहील.
सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज
सौर ऊर्जेची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे रात्रीच्या वेळी वीज निर्मिती बंद होणे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने या योजनेत एक महत्त्वाचा नियम जोडला आहे. प्रत्येक फ्लोटिंग सोलर प्रोजेक्टमध्ये किमान दोन तासांचा बॅटरी एनर्जी स्टोरेज सपोर्ट (BESS) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे दिवसा तयार झालेली अतिरिक्त वीज बॅटरीत साठवली जाईल आणि सूर्यास्तानंतर जेव्हा विजेची मागणी सर्वाधिक असते, तेव्हा ती वापरता येईल.
आव्हानांचे मोठे डोंगर
ही योजना जितकी आकर्षक आहे, तितकीच ती आव्हानात्मक देखील आहे. एका जुन्या रिपोर्टनुसार, या प्रकल्पांसमोर प्रामुख्याने तीन मोठी आव्हाने आहेत: 1. एंकरिंग आणि मूरिंग: पाण्यात पॅनेल एकाच जागी स्थिर ठेवण्यासाठी मजबूत एंकरिंगची गरज असते. 2. मान्सून आणि वादळे: पावसाळ्यात येणारे पूर आणि वेगवान वाऱ्यांमुळे हे तरंगते प्लॅटफॉर्म वाहून जाण्याचा किंवा खराब होण्याचा धोका असतो. 3. उच्च खर्च: जमिनीवरील प्लांटच्या तुलनेत फ्लोटिंग स्ट्रक्चर तयार करण्याचा खर्च खूप जास्त असतो.
‘प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना’ ही भारताला कार्बनमुक्त आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक क्रांतीकारी पाऊल आहे. आव्हानांवर मात केल्यास ही योजना देशाच्या ऊर्जेचे चित्र बदलू शकते.