
इंटरनेट हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माहिती क्षणात दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचवण्याची ताकद इंटरनेटमध्ये आहे. मात्र सध्या मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे इंटरनेट सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतात इंटरनेट सेवा खंडित होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण जहाजांचा प्रमुख मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुणी हा एक डिजिटल चोकपॉइंट असल्याचेही समोर आले आहे. कारण याच मार्गाने भारतात तेल आणि इतर आयात केलेले पदार्थ येतात. तसेच याच परिसरात समुद्राखाली फायबर-ऑप्टिक केबल्स टाकलेल्या आहेत, ज्या इटरनेटद्वारे भारताला जगाशी जोडतात. मात्र आता या केबल मार्गावर धोका निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जगभरातील सुमारे 99% आंतरराष्ट्रीय डेटा ट्रान्समिशन समुद्राखाली टाकलेल्या फायबर-ऑप्टिक केबल्सद्वारे होते. भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी सुमारे एक-तृतीयांश भाग या खाडी प्रदेशातून जातो. महत्त्वाच्या केबल सिस्टिम्स, SEA-ME-WE 4 submarine cable System, I-ME-WE submarine cable system आणि FLAG FALCON submarine cable system या भारतातील मुंबई आणि चेन्नई या शहरांना युरोप आणि इतर भागाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या प्रदेशातील केबल्सच्या देखभालीवर परिणाम झाला आहे. 2025 च्या शेवटी जेद्दाह जवळ एक केबल कट झाली होती. ही केबल दुरूस्त करण्याचे काम सुरु होते मात्र आता मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांच्या धोक्यामुळे काम थांबवावे लागले आहे. त्यामुळे आता या केबलची दुरुस्ती करण्यासाठी खूप जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा भारताच्या रिअल-टाइम फायनान्शियल ट्रेडिंग सिस्टिम आणि सुमारे 270 अब्ज डॉलरच्या डेटा सेंटर उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे इंटरनेट सेवा खंडित होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, भारतात इंटरनेट सेवा खंडित झाल्यास वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खाजगी आणि सरकारी अशी दोन्ही कामे बंद पडू शकतात. बहुतेक लोकांच्या नोकऱ्या या इंटरनेटवर अवलंबून आहेत. अशा नोकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे युद्ध लवकरात लवकर थांबले नाही, तर भारतातील इंटरनेट सेवा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.