देशातील एकमेव किल्ला, सूर्यास्त होताच ज्याचे दरवाजे होतात बंद! सर्वात गूढ आणि… जायलाही लोक टरकतात
राजस्थानमधील भानगड किल्ला हा भारतातील सर्वात रहस्यमय आणि भुतांचा किल्ला म्हणून ओळखला जातो. दिसायला सुंदर असला तरी, सूर्यास्तानंतर येथे प्रवेश निषिद्ध आहे. एका शापामुळे या किल्ल्यात आत्म्यांचा वावर असतो अशी अख्यायिका आहे. दिवसा पर्यटक इथल्या ऐतिहासिक वैभवाचा अनुभव घेतात, पण संध्याकाळ होताच सर्वजण काढता पाय घेतात.

दिसायला अत्यंत सुंदर आहे आणि अत्यंत भयानक आहे, अशी एखादी जागा आहे का? जगात सुंदर आणि भयानक जागा क्वचितच आढळतील. भारतात मात्र राजस्थानात अशी एक जागा आहे. अरावलीच्या जंगलात ही जागा आहे. विशेष म्हणजे हे काही पर्यटन स्थळ नाहीये. तर हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. भानगडचा किल्ला हा असाच अत्यंत सुंदर आणि भयानक आहे. लोक दिवसभरात या किल्ल्यात फिरतात. मात्र, संध्याकाळ होताच या किल्ल्यातून काढता पाय घेतात. कारण हा किल्ला अत्यंत डरावना असल्याचं सांगितलं जातं. अनेकांना अनेक अनुभव आले. त्यामुळेच सूर्यास्त होताच या किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात.
जयपूर आणि अलवरच्या दरम्यान सरिस्का नॅशनल पार्कपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. भूताखेतांच्या गोष्टींसाठी हा किल्ला अत्यंत प्रसिद्ध आहे. मात्र, तरीही पर्यटकांना हा किल्ला नेहमी आकर्षित करत राहिला आहे. या किल्ल्याच्या भोवतीचं सौंदर्य नेहमीच पर्यटकांना खुणावत असतं. हा किल्ला 17 व्या शतकातील आहे. राजा मान सिंह पहिले यांनी हा किल्ला बनवला होता. मुगल सम्राट अकबराच्या दरबारातील राजा मानसिंह हे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांनी आपला नातू माधो सिंह पहिले यांना राहण्यासाठी हा किल्ला बनवला होता.
भव्य महल तुमचं स्वागत करतो…
आजही या किल्ल्याच्या भोवतीचा परिसर आणि किल्ला अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. या किल्ल्याच्या लाहौरी गेट, अजमेरी गेट, फुलबारी गेट आणि दिल्ली गेटमधून आत गेल्यास उंचच उंच पुरातन मंदिरं, पुरानी हवेल्या आणि भव्य महल तुमचं स्वागत करतो. या वास्तूंची कारागिरी पाहून कोणीही वेडापिसाच होईल. इतकी अप्रतिम कारागिरी करण्यात आलेली आहे. या किल्ल्यातील अंगणातील भुलभुलैय्या सारख्या गल्ल्यांमधून फिरणं म्हणजे एक गंमतच असते. जुन्या भिंतीवर ऊन सावलीचा चाललेला खेळ मानसिक शांतता देत असतो. एकेकाळी या किल्ल्यामध्ये किती गजबजाट असेल, या किल्ल्याचं काय वैभव असेल याची कल्पना या निमित्ताने येते.
या रहस्यमयी किल्ल्यात मनाला शांती देणारा एक कोपराही आहे. सोमेश्वर महादेवाचं मंदिर. स्थानिक लोक या देवतेला खूप मानतात. मंदिराची बारीक नक्षीकाम मनाला मोहून टाकतं आणि मनात शांतता निर्माण करतं. या किल्ल्याच्या वरून तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा अद्भूत राजस्थान तुमच्या नजरेत भरून जातं. पावसाळा संपल्यानंतर गेल्यावर तर समोरचं हिरवंगार रान तुम्हाला मोहून टाकल्याशिवाय राहत नाही.
अन् शाप मिळाला…
या किल्ल्याला शाप मिळाल्याची अख्यायिका आहे. काळीजादू करणाऱ्या एका तांत्रिकाचा जीव राजकुमारीवर आला होता. तो तिच्यासाठी वेडापिसा झाला होता. जेव्हा राजकुमारी बाजारात गेली, तेव्हा तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने तिला प्रेम रस देण्याचा प्रयत्न केला. पण राजकुमारीने तो घेण्यास नकार दिला. तिने नंतर हा प्रेम रस घेतला आणि उंचावरून फेकून दिला.
मरता मरता…
ज्या टेकडावर तिने हा प्रेम रस फेकला, ती टेकडी रहस्यमयरित्या त्या तांत्रिकाच्या अंगावर कोसळली असं सांगितलं जातं. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मरता मरता या तांत्रिकाने संपूर्ण गावाला शाप दिला. हा किल्ला आणि त्याच्या आसपासच्या वस्त्या कायमसाठी उद्ध्वस्त होतील. भग्न होतील, असा शाप त्याने दिला.
त्यानंतर या गावात चमत्कारीक गोष्टी घडू लागल्या. सूर्यास्त होताच या किल्ल्यात आत्म्यांचा वावर सुरू होतो असं सांगितलं जातं. त्यामुळेच सूर्यास्त होताच या किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात. स्थानिक लोक आजही या किल्ल्यातील चमत्कारीक गोष्टी सांगत असतात. तसेच या किल्ल्यात जो जातो, तो परत येत नाही, असा दावाही स्थानिक लोक करतात. त्यामुळे या किल्ल्यात रात्री जायला सहसा कोणीच धजावत नाही.