Loan Recovery | आता कर्ज वसुली गांधीगिरीने, सकाळी 8 वाजेपूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर ग्राहकाला कॉलही करता येणार नाही, एजंटचे हात बांधले

| Updated on: Aug 13, 2022 | 11:54 AM

Loan Recovery | कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंटला आता केव्हाही तुमच्या दरवाजावर थाप मारता येणार नाही. कॉल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियम तयार केले आहेत, काय आहेत हे नियम?

Loan Recovery | आता कर्ज वसुली गांधीगिरीने, सकाळी 8 वाजेपूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर ग्राहकाला कॉलही करता येणार नाही, एजंटचे हात बांधले
वसुलीचा जाच थांबवा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Loan Recovery | कर्ज (Loan)घेतले आणि ते फेडण्यात चूक झाली. अथवा अचानक आलेल्या संकटाने तुम्हाला वेळेवर कर्ज फेड जमली नाही की काय ताप सहन करावा लागतो, माहिती आहे ना? कुठुन कर्ज घेतलं असं होतं. त्यात रिकव्हरी एजंटाच (Recovery Agent) आणि त्याच्या कॉलचा तर प्रचंड मनस्ताप होतो. त्यावेळी कर्ज नको पण रिकव्हरी एजंट आवर अशी अवस्था होते. अनकेदा याविषयी कर्जदारांनी (Borrowers) सार्वजनिक ओरड केली आहे. ही दादागिरी थांबवण्याची विनंती केली आहे. कर्ज घेतले म्हणजे खासगी आयुष्य बँकांनी, कर्जपुरवठादारांनी (Creditors) खरेदी केलेले नसते. पण कर्जदारांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मध्यंतरी न्यायालयाच्या अनेक निकालांमुळे व्यवस्थेला जाग आली आणि या दादागिरीविरोधात नियम तयार करण्यात आले. आता वसुली एजंटच्या त्रास अजून कमी होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)नवीन नियमावली (New Rules) तयार केली आहे. त्यात ग्राहकहिताच्या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. काय आहेत हे नियम, जाणून घेऊयात.

काय आहे नियम

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी वित्तपुरवठादार, बँका, वित्तीय सेवापुरवठादार यांच्या रिकव्हरी एजंट्ससाठी या ताज्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, त्यांना कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकत नाहीत. याविषयी बँकेने अधिसूचना जारी केली आहे, RBI ने म्हटले आहे की बँका, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs) आणि मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (ARCs) यांनी कर्जाच्या वसुलीसाठी दिलेल्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करायला हवे. या वित्तीय संस्थांनी थकित कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारांना नाहक त्रास द्यायचा नाही. वसुली एजंट जर कर्जदारांना थकीत कर्जाच्या वसुलीसाठी नाहक त्रास देत असतील तर त्यांना असे करण्यापासून आता वित्तीय संस्थांनी प्रतिबंध घालावा. नवीन नियमानुसार, आता ही जबाबदारी त्या त्या वित्तसंस्थांवर सोपवण्यात आली आहे. त्यांनाच त्यांच्या वसुली एजंटला थांबवावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

धमकी दिल्यास खबरदार

रिझर्व्ह बँकेने वसुली एजंटच्या वर्तणुकीवर पहिल्यांदा बोट ठेवले आहे. एवढेच नाहीतर आता वसुली एजंटच्या वसुलीच्या पद्धतीवर ही आक्षेप घेतला आहे. कर्जदारांना कोणत्याही प्रकारचे अनुचित संदेश पाठवणे, धमकी देणे किंवा अज्ञात नंबरवरून कॉल करण्यास मध्यवर्ती बँकेने मनाई केली आहे. अशाप्रकारे कॉल करणे टाळले नाहीतर उचीत कार्यवाहीचे निर्देशही बँकेने दिले आहेत. रिकव्हरी एजंट कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकत नाहीत.
आरबीआय कर्जाच्या वसुलीच्या मुद्द्यांवर वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करत आहे. नियमन केलेल्या संस्थांनी कर्जदारांना त्रास देऊ नये किंवा त्यांना त्रास देऊ नये, असेही यापूर्वी म्हटले होते. परंतु अलिकडच्या काळात, वसुली एजंटांकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाया पाहता, आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.