अटल सेतूवर धावत्या कारने घेतला पेट!
रात्री मुंबईच्या अटल सेतूवर नवी मुंबईहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील दोन प्रवासी सुखरूप बाहेर पडले. घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र आता वाहतूक सुरळीत झाली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रात्री मुंबईच्या अटल सेतूवर नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एका कारने अचानक पेट घेतला. रात्री सव्वानऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली.
कारमध्ये असलेले दोन प्रवासी चालकाच्या सतर्कतेमुळे वेळीच बाहेर पडले. चालकाने तातडीने गाडी बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे अटल सेतूवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सध्या अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीस आगीच्या कारणांची सखोल चौकशी करत आहेत. मात्र, आता अटल सेतूवरील दोन्ही मार्गांवर, म्हणजेच नवी मुंबई ते मुंबई आणि वडाळा ते नवी मुंबई, वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

