छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषेचा स्वाभिमान शिकवला! फडणवीसांचे प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण केले. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला शुद्ध करून स्वभाषेचा अभिमान शिकवला. मराठी भाषेला ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा बनवून तिचे संवर्धन करणे, लोककला व साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध भाषिक परंपरेचा गौरव केला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि कलावंतांचे कौतुक करताना फडणवीस यांनी विधानमंडळातील विनोदाच्या परंपरेचे स्मरण केले. राजकारणातील विनोद साहित्याला कसा हातभार लावतो, हे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेल्या कार्यावर विशेष भर दिला. शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना मराठी भाषेला शुद्ध केले आणि तिला फारसी व अरबी भाषेच्या प्रभावापासून मुक्त केले. स्वभाषेचा अभिमान आणि तिचे शुद्धीकरण ही महाराजांची देणगी असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्ञानोबा-तुकोबांच्या साहित्यापासून सुरू झालेला मराठी भाषेचा प्रवास त्यांनी अधोरेखित केला. मराठी भाषेला केवळ साहित्याने नव्हे, तर लोककला आणि लोकसाहित्यानेही जिवंत ठेवले जाते, असे फडणवीस म्हणाले. पुढील पिढ्यांपर्यंत लोककला, लोकसाहित्य आणि अभिजात साहित्य पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा बनवून तिला प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषेचा स्वाभिमान शिकवला - देवेंद्र फडणवीस
कधी-कधी राजकीय नेतेही विनोदाचा भाग होतात! शिंदेंचा मिश्किल टोला
मराठी भाषा भवनाला विलंब का झाला याचा...; उदय सामंतांचं मोठं विधान
समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

