Raj Thackeray : जर पूल धोकायदायक होता तर… कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप, सरकारला घेरलं अन् केली प्रश्नांची सरबत्ती
'काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. '
पुण्यातील मावळमधील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काल मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटेनेत 4 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून 51 पर्यटक यातून बचावल्याची माहिती समोर येत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे. सोशल मीडिया एक पोस्ट करत राज ठाकरे यांनी कुंडमळा दुर्घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. इतकंच नाहीतर सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करून चांगलंच घेरल्याचेही पाहायला मिळाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
‘कुंडमळा हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?’ असे अनेक सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेत.
पुढे ते असेही म्हणाले, लोकांनी उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं.