Cotton : कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे बदलणार खरिपाचे चित्र, कापूस लागवडीला कशाचा अडसर?

| Updated on: May 16, 2022 | 2:09 PM

खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी विभाग व राज्य सरकारने एक धोऱण आखून घेतले आहे. त्याची अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदा 1 जून शिवाय शेतकऱ्यांना कापसाचे बियाणेच मिळणार नाही. हंगामपूर्व कापसाची लागवड झाली की बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो.

Cotton : कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे बदलणार खरिपाचे चित्र, कापूस लागवडीला कशाचा अडसर?
कापूस पीक
Follow us on

नंदुरबार : सध्या पूर्वमशागतीची कामे पूर्ण झाली असून आता (Kharif Sowing) खरीप पेरणीचे वेध लागले आहेत. उत्पादनवाढीसाठी शेतकरी परिश्रम आणि सरकार विविध योजना राबवत आहे. यंदा मात्र, हंगाम सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरवर्षी हंगामपूर्व (Cotton Cultivation) कापसाची लागवड केली जाते पण यंदा (Agricultural Department) कृषी विभागाने धोरणांमध्ये बदल केला आहे. 1 जूनच्या आतमध्ये कापसाचे बियाणे हे विक्रीसाठी उपलब्धच केले जाणार नाही. त्यामुळे राज्यात यावर्षी पूर्वहंगामी कापसाची लागवड होण्याची शक्यता कमी आहे. हंगामपूर्व कापसाची लागवड झाली की, बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे अळीची ही साखळी तोडण्यासाठी कृषी विभागाने हा निर्णय घेतला आहे. आता त्याचे पालन होणार का हे पहावे लागणार आहे.

नेमका काय आहे कृषी विभागाचा निर्णय?

खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी विभाग व राज्य सरकारने एक धोऱण आखून घेतले आहे. त्याची अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदा 1 जून शिवाय शेतकऱ्यांना कापसाचे बियाणेच मिळणार नाही. हंगामपूर्व कापसाची लागवड झाली की बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे शेतजमिनीचे व इतर पिकाचेही नुकसान होते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

20 टक्के क्षेत्रावर पूर्व हंगामी कापूस

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. राज्यातील कापसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त केला जात आहे. प्रमुख्याने विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कापसाची लागवड केली जात असते त्यात एकूण लागवडीच्या 20 टक्के हिस्सा हा पूर्व हंगामी कापसाच्या लागवडीचा असतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाची लागवड करत असतात या लागवडीला पूर्वहंगामी कापूस लागवड असे म्हणतात. मात्र, यावर्षी राज्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड होणार नसल्याचे चित्र दिसत आहे. कृषी विभागाच्या या निर्णयाबद्दल व्यापाऱ्यांनी विरोध केला होता पण कृषी आपल्या निर्णयावर ठाम आहे. कारण बोंडअळीमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी विभागाच्या निर्णयानंतर नाराजी

1 जून शिवाय कापूस बियाणांचे वितरीत होणार नाही. शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असूनही शेतकऱ्यांना पूर्व मोसमी कापसाची लागवड करणे शक्य नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी चे चित्र दिसून येत आहे तर दुसरीकडे योग्य बियाण्याचे नियोजन करण्यासाठी तसेच वाढत्या तापमानामुळे कापसाच्या पूर्वहंगामी लागवडीत अनेक धोक्याची संभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

असे आहे कपाशी बियाणांचे नियोजन

हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत 1 ते 10 मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून 15 मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकऱ्यांना 1 जून नंतर विक्री केले जाणार आहे.