नैसर्गिक आपत्तीमुळे जनावराचा मृत्यू ; नुकसानभरपाईसाठी असा करा अर्ज…

| Updated on: Oct 11, 2021 | 1:30 PM

गेल्या आठ दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात होत आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण हे जास्त झाले आहे. अशा स्थितीमध्ये शेतरकऱ्यांनी प्रशासनाकडून आर्थिक मदतीसाठी काय प्रक्रिया असते याची माहिती करुन घेणे आवश्यक आहे...

नैसर्गिक आपत्तीमुळे जनावराचा मृत्यू ; नुकसानभरपाईसाठी असा करा अर्ज...
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : निसर्ग बळीराजावर कोपला असल्याचे चित्र सबंध मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे. उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरवात केली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामध्ये जनावरे दगावण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. शेळ्या-मेंढ्या ह्या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत तर अनेक ठिकाणी जनावरांच्या अंगावर वीज कोसळून दुर्घटना झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. अद्यापही खरीपातील पीके ही पाण्यातच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेलेच आहे पण गेल्या आठ दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात होत आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण हे जास्त झाले आहे. अशा स्थितीमध्ये शेतरकऱ्यांनी प्रशासनाकडून आर्थिक मदतीसाठी काय प्रक्रिया असते याची माहिती करुन घेणे आवश्यक आहे…

ज्याप्रमाणे पीकांना, फळपिकांना नुकसानभरपाई देण्याचे प्रायोजन आहे त्याच प्रमाणे शेतकऱ्याचे जनावर हे वीज, भुकंप, सर्पदंश तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे दगावल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्वरुपात मदत मिळणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे यासंबंधी माहिती घेऊयात..

1) वीज, भूकंप, सर्पदंश तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जनावराचा मृत्यू झाला असेल तर सर्वात आगोदर याची माहिती गावचे तलाठी यांना देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी यांना देखील प्राथमिक माहिती द्यावी लागणार आहे. यामुळे घटना नेमकी काय झाली आहे त्याचे स्वरुप हे महसूल आणि पशूवैद्यकीय विभाग यांच्या लक्षात येतो.

2) नेमका जनावराचा मृत्यू कशामुळे झाला आहे त्यासंबंधी अर्ज हा तलाठी यांना करावा लागणार आहे. यामध्ये घटनेचे वर्णन शेतकऱ्याचे नाव आणि जनावराचे वय व त्यासंबंधी संपूर्ण माहिती अर्जामध्ये नमूद करावी लागणार आहे.

3) नेमकी घटना काय घडली आहेय त्याची प्राथमिक माहिती घेण्यासाठी गावचे तलाठी आणि घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक यांच्या स्वाक्षरीने हा अर्ज पशुवैद्यकीय अधिकारी यांना सपूर्द करावा लागणार आहे. यामुळे घटनेचे कारण हे स्पष्ट होणार आहे. महसूल विभाग आणि पशु संवर्धन विभाग या दोन्ही विभागाच्यावतीने ही कार्यवाही केली जाते.

4) तलाठी हे पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले की, ते शेतकऱ्यांसमवेत मृत जनावराचे छायाचित्र काढतात. यामुळे वेळ, ठिकाण, शेतकरी कोण आहे याची माहीती समजते.

5) घटनेचे सर्व स्वरुप लक्षात आल्यानंतर पशुवैद्यकी अधिकारी हे शवविच्छेदन करण्यासाठी घटनास्थळी दाखल होतात. यामुळे जनावराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे लक्षात येते. त्यानुसाक शेतकऱ्यांने अर्जात नमूद केलेले कारण आणि पशुवैद्यकीय अधिकऱ्याचा अहवाल या दोन्ही बाबी एकच असतील तर नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार आहे.

6) शवविच्छेदनाचा अहवाल पशुवैद्यकीय अधिकारी हे तलाठी यांच्याक़डे सपूर्द करतात. त्यानंतर शेतकऱ्याने केलेल्या अर्जासह तलाठी आणि पशूवैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल हा तहसील कार्यालयात जमा केला जातो.

7) जिल्हाधिकारी यांच्या संमतीनुसार शेतकरी हा मदतीसाठी पात्र होतो. महसूल विभागाच्यावतीने शेतकऱ्यास ही नुकसानभरपाईची मदत देऊ केली जाते.

मदतीचे स्वरुप कसे ठरवले जाते?

पशुवैद्यकीय अधिकारी हे शवविच्छेदनाकरिता घटनास्थळी दाखल झाले असता त्या मृत जनावराची अंदाजे रक्कम ठरवतात. त्यांनी ठरवलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम ही शेतकऱ्यास मदत म्हणून दिली जाते. घटना घडल्यापासून 24 तासांच्या आतमध्ये ही रक्कम शेतकऱ्यास देणे अपेक्षित आहे. मात्र, याला सहा- सहा महिन्याचा कालवधी लागत असल्याने शेतकरीही या किचकट प्रक्रियेकडे पाठ फिरवत आहेत. (Apply for compensation if the animal dies due to natural calamities, important news for farmers.)

संबंधित बातम्या :

ज्याला मागणी, त्याच फळाची होणार लागवड ; सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत ‘अफवा अन् वास्तव’

खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढा, पण ‘अशी’ करा पूर्वतयारी…