Rabi Season: ज्याला बाजारात भाव तेच पीक वावरात, देशभरातील शेतकरी ‘कमर्शियल’

| Updated on: Dec 27, 2021 | 7:15 AM

वर्षभर तेलांच्या दरात कमी-जास्तपणा झालेला आहे. तर गव्हाचे क्षेत्र वाढल्याने दरात घट झाली आहे. याचाच परिणाम यंदाच्या रब्बी हंगामावर झालेला आहे. देशात तेलबियांच्या क्षेत्रात तब्बल 15 लाख 58 हजार हेक्टराने वाढ झाली आहे तर दुसरीकडे दरात घट झालेले गव्हाचे क्षेत्र मात्र घटले आहे. रब्बी हंगमात सरासरी क्षेत्र हे गव्हाचे अधिक आहे पण त्या तुलनेत यंदा पेरा झालेला नाही.

Rabi Season: ज्याला बाजारात भाव तेच पीक वावरात, देशभरातील शेतकरी कमर्शियल
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : कृषीप्रधान देशात हंगामानुसार पिके ही ठरलेलीच होती. उत्पादनात घट अथवा वाढ याचा विचार न करता थेट पारंपारिक पिकांवरच शेतकरी भर देत होता. मात्र, आता काळाच्या ओघात देशभरातील शेतकरी बदलत आहे. बाजारपेठेचा अभ्यास करुनच शेतकरी आता उत्पादन घेत आहे. याचा प्रत्यय यंदाच्या (Rabi season) रब्बी हंगामात आला आहे. वर्षभर तेलांच्या दरात कमी-जास्तपणा झालेला आहे. तर गव्हाचे क्षेत्र वाढल्याने दरात घट झाली आहे. याचाच परिणाम यंदाच्या रब्बी हंगामावर झालेला आहे. देशात ( oilseeds) तेलबियांच्या क्षेत्रात तब्बल 15 लाख 58 हजार हेक्टराने वाढ झाली आहे तर दुसरीकडे दरात घट झालेले गव्हाचे क्षेत्र मात्र घटले आहे. रब्बी हंगमात सरासरी क्षेत्र हे गव्हाचे अधिक आहे पण त्या तुलनेत यंदा पेरा झालेला नाही.

गव्हाचे क्षेत्र सर्वाधिक पण पेरणीच घट

रब्बी हंगामातील सर्वात प्रमुख पीक असलेल्या गव्हाचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 लाख 21 हजार हेक्टराची घट झाली आहे. 24 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी 3 कोटी 5 लाख 47 हजार हेक्टरावर गहू पेरला आहे. गतवर्षी याच कालावधीत हा आकडा 3 कोटी 9 लाख 68 हजार हेक्टर होता. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये अधिक भागात पेरणी झाली आहे तर राजस्थान, बिहार, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये पेरण्या रखडलेल्या आहेत. गव्हाचे क्षेत्र कमी होण्यामागील कारण तेलबिया क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ असल्याचे कारण आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना मोहरीला चांगला दर मिळाला होता. त्यामुळेच यंदा शेतकऱ्यांनी मोहरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे आणि गव्हाचे क्षेत्र कमी केले आहे. त्यामुळे यंदा मोहरीचे उत्पादन विक्रमी होणार असल्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. आगामी सत्रात ते विक्रमी पातळीवर पोहोचू शकते असेही सांगण्यात आले आहे.

असा आहे रब्बीचा पेरा..

कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 24 डिसेंबरपर्यंत देशातील 95 लाख 4 हजार हेक्टर क्षेत्रात तेलबियांच्या पिकांची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तेलबियांचा पेरा 79 लाख 46 हजार हेक्टरावर होता. म्हणजेच यंदा 15 लाख 58 हजार हेक्टराने घट झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये तेलबियाक्षेत्र वाढले आहे. झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड आणि बिहार गेल्या वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.

भात शेतीवर शेतकऱ्यांचा भर

रब्बी हंगामात भातशेती करु नये असे अवाहन करण्यात आले होते. मात्र, अधिकच्या उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत भात शेतीवर भर दिलेलाच आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना धानाची लागवड करू नये, असे आवाहन तेलंगणा सरकारने केले आहे. आंध्र प्रदेशातही असाच प्रयत्न केला जात आहे. रब्बी हंगामात भात लागवडी ऐवजी पर्यायी पिकांच्या लागवडीला चालना देऊनही यावेळी क्षेत्रात थोडीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भात शेतीचे क्षेत्र 12 लाख 72 हजार हेक्टर होते, जे यावर्षी 20 हजाराने वाढून 12 लाख 92 हजार हेक्टरवर गेले आहे.

संबंधित बातम्या :

अतिवृष्टी-अवकाळीचा सामना करुनही मराठवाड्यात बदलतोय पीकांचा ट्रेंड , काय आहेत कारणे?

Latur Market : सोयाबीनच्या दरात चढ-उतार, शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेलीच, शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

शेतकऱ्यांचे शहाणपण : रान रिकामे राहिले तरी चालेल, पण फरदड उत्पादन नको रे बाबा, काय आहे फरदड पीक?