बळीराजासमोर नवं संकट, पिकांसाठी खतं मिळेना; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Fertilizer Shortage Maharashtra : राज्यातील विविध भागात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळणे कठीण झाले आहे. खत मिळत नसल्यामुळे यंदा उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे.

गेल्या काही काळापासून राज्यातील शेतकऱ्यांवर अनेक संकटे येत आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अवकाळीमुळे उभी पिके आडवी झाली. मात्र आता शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभ राहिलं आहे. राज्यातील विविध भागात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळणे कठीण झाले आहे. खत मिळत नसल्यामुळे यंदा उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात खताची परिस्थिती काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
हिंगोलीत डीएपी खताचा मोठा तुटवडा
हिंगोली जिल्ह्यात ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर डीएपी खताचा मोठा तुडवडा आहे . याबाबत टीव्ही 9 मराठीने कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील मार्केटमध्ये जाऊन आढावा घेतला. यावेळी दुकानात खत नसल्याच वास्तव समोर आलं. पहिल्या दुकानात खत नसल्याचं सांगण्यात आले. दुसऱ्या दुकानात खत उद्या देतो असं सांगत किंमत जास्त सांगण्यात आली. आणखी काही दुकानांमध्ये खत मिळत नसल्याचं समोर आलं आहे. काही शेतकऱ्यांनी डीएपी महागड्या दराने विकले जात असल्याचीही माहिती दिली आहे.
वाशिम जिल्ह्यातही डीएपी खताचा मोठा तुटवडा
खरीप हंगामाच्या तोंडावर वाशिम जिल्ह्यात डीएपी खताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी 12 हजार 800 मेट्रिक टन डीएपीची गरज असते, मात्र आता आतापर्यंत केवळ 4 हजार 100 मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. मागणीच्या तुलनेत सुमारे 68 टक्के डीएपी कमी आले आहे. सध्या जिल्ह्यात शिल्लक 776 मेट्रिक टन डीएपी साठा असून त्यापैकी 668 मेट्रिक टन संरक्षित साठा आहे. म्हणजेच जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांवर विक्रीसाठी फक्त 108 मेट्रिक टन डीएपी उपलब्ध आहेत. काही कृषी केंद्रांवर डीएपीचा स्टॉक संपला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
वर्धा जिल्ह्यातही डीएपी खताचा तुटवडा
वर्धा जिल्ह्यातही डीएपी खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत युरिया आणि डीएपी खताला मोठी मागणी आहे. पण डीएपी खताची उपलब्धता कमी झाली आहे. काही कंपन्या छुप्या पद्धतीने लिंकिंग करत असल्याचा आरोप वर्धा जिल्हा कृषी व्यवसायी संघाचे जिल्हाध्यक्ष रवी शेंडे यांनी केला आहे. काही कंपन्या दुकानदारांपर्यंत खत पोहचवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. डीएपी खताची मागणी जास्त असून उपलब्धता कमी असल्याने अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चंद्रपुरातही खतीची टंचाई
खरीप हंगाम काही दिवसांवर आला असताना खत टंचाईने शेतकरी त्रस्त आहेत. आधार लिंक करूनही खताचा साठाच नसल्याची ओरड होत आहे. शासनाने दखल घेत डीएपी आणि युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता 11.44 लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 5.52 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. जिल्ह्यात कापूस (39.97 टक्के) आणि भात (39.73 टक्के) ही प्रमुख पिके असून, सोयाबीन आणि तुरीचे क्षेत्रही लक्षणीय आहे. मात्र खत टंचाईने शेतकऱ्यांच्या चिंता वाढविल्या आहेत.
परळी तालुक्यात युरिया खताचा तुटवडा; खत बियाणे चे भाव वाढले
बीडच्या परळी तालुक्यात सध्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मान्सून आता काही दिवसांत दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतीपूर्व मशागत पूर्ण केली असून आता पावसाची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर खत आणि बियाणे खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. मात्र, यंदा खत आणि बियाण्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना दुसरीकडे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परळी तालुक्यातील अनेक खत विक्रेत्यांकडे युरिया खत उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
काही शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असून शासकीय दरापेक्षा 50 ते 100 रुपये अधिक दिल्यास खत उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, पारंपरिक युरियाऐवजी ‘नॅनो युरिया’ वापरण्याचा सल्ला काही विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी दुकानदारांकडे ‘कॉसमॉस ऑनलाइन सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी आणि आवश्यक माहिती नोंदवल्यानंतरच खत विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
अमरावतीतही खतांचा तुटवडा
अमरावती जिल्ह्यात रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी बाजारपेठेमध्ये युरिया आणि डीएपी खत मिळत नाहीये. इतर खतांचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. खतांच्या किमतीही सरासरी 400 रुपयांनी वाढल्या आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येलाच खतांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम रासायनिक खतांच्या उत्पादनावर झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
खतांच्या किमतीत वाढ
- 20-20-13 : आधी-1500, आता 1800
- सुफर फास्टफेस्ट : आधी – 650, आता – 750
- पोटेश MOP : आधी 1800, आता – 2200
- 15-15-15 : आधी 1650, आता 1950
- 8-21-21 : आधी – 1975, आता – 2200