Rabi Season : लगबग सुगीची, शेतकऱ्यांचा कडधान्यावर भर, यंदा वाढणार ज्वारीचे दर..!

| Updated on: Mar 23, 2022 | 9:32 AM

अवकाळी, ढगाळ वातावरण यासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करीत रब्बी हंगामातील पिकेही अखेर अंतिम टप्प्यात आली आहेत. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या सुगीची लगबग सुरु असून ढगाळ वातावरणाच्या सावटाखालीच ज्वारी पिकाची काढणी सुरु आहे. मजुरांची टंचाई आणि पावसाची धास्ती यामुळे शेतकरी कुटुंब रात्रीचा दिवस करुन शेतीकामे करुन घेत आहे.

Rabi Season : लगबग सुगीची, शेतकऱ्यांचा कडधान्यावर भर, यंदा वाढणार ज्वारीचे दर..!
रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून ज्वारी कापणीला सुरवात झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : अवकाळी, ढगाळ वातावरण यासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करीत (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकेही अखेर अंतिम टप्प्यात आली आहेत. (Marathwada) मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या सुगीची लगबग सुरु असून ढगाळ वातावरणाच्या सावटाखालीच ज्वारी पिकाची काढणी सुरु आहे. मजुरांची टंचाई आणि पावसाची धास्ती यामुळे शेतकरी कुटुंब रात्रीचा दिवस करुन शेतीकामे करुन घेत आहे. यंदा रब्बी हंगामातील पीक पध्दतीमध्ये शेतकऱ्यांनी बदल केला असून पारंपरिक पिकांचे उत्पादन न घेता (Cereals) कडधान्यावर भर दिला आहे. त्यामुळे किमान यंदा तरी ज्वारीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा हरभरा आणि सोयाबीनने या पिकाची जागा घेतली आहे.

ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली

मराठवाड्यात पाऊस नाही पण गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आता तर पाऊस झाला तर थेट शेतीमालावरच परिणाम होणार आहे. त्यामुळे पीक काढणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा ही पीके काढणीला आलेली आहेत. यातच मजुरीचे दरात वाढ झाल्याने शेतकऱ्याचं अख्ख कुटुंब शिवारात राबत आहे. एवढेच नाही तर पूर्वी ज्वारी ही उपटून काढली जात होती तर आता ज्वारीची देखील कापणी होत आहे. निसर्गाचा लहरीपणा किमान रब्बी हंगामातील पिकावर बेतू नये म्हणून शेतकऱ्यांची कसरत सुरु आहे.

उत्पादन घटल्याने दरात वाढ होण्याचा अंदाज

ज्वारी पेरणीपासून काढणी पर्यंतचे कष्ट आणि बाजारात मिळणारे कवडीमोल दर यामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा तर सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट ही निश्चित मानली जात असून घटत्या उत्पादनामुळे किमान यंदा तरी अधिकचे दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या बाजारपेठेत ज्वारी 2 हजार 500 ते 3 हजार रुपये दर मिळत आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी

मराठवाड्यात पाऊस नाही पण ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. जे खरिपात झाले त्याची पुनरावृत्ती होऊ न देता उत्पादनाची सुरक्षा ही महत्वाची आहे. शिवाय या वातावरणामुळे ज्वारीची कणसे काळवंडण्याचा धोका असतो. त्यामुळे काढणी, मोडणी आणि लागलीच मळणी कामे उरकून पीक पदरात पाडून घेण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Chemical Fertilizer : रासायनिक खताने उत्पादनात वाढ, शेतजमिनीचे काय? कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

Good News : मार्च अखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी, State Government चा निर्णय नेमका कुणासाठी?

Sugar Factory : पावसाळ्याच्या तोंडावरच बंद होणार साखर कारखाने, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटेल का?