
पीएम किसान योजना (PM Kisan Yojana Big Update) पीएम मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. वर्षाला 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. तीन हप्ता या योजनेमाध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. पण या योजनेत कायम राहण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नाहीतर हप्ता थांबविला जाऊ शकतो.
60 हजार शेतकऱ्यांचा थांबवला हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फायदा त्याच शेतकऱ्यांना मिळतो जे या योजनेत नोंदणी आणि ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करतात. जर तुम्ही पुढील हप्त्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर मग तुमचा हप्ता बँकेत जमा होणार नाही. या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नयेत यासाठी सरकार डोळ्यात तेल घालून आहे.
पती आणि पत्नीच्या नावावर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पतीला मानधन देण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्याचा निकष लागू करण्यात आला आहे. त्याचा फटका राज्यातील 60 हजार शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्या बँक खात्यात योजनेचा 20 वा हप्ता जमा झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
ही नोंदणी अत्यावश्यक
या योजनेत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कसरत म्हणजे योजनेत नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर या योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर तुमचा हप्ता थांबविण्यात येऊ शकतो. या योजनेसाठी नोंदणी अत्यावश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहित प्रक्रियेत नोंदणी प्रक्रिया केलेली नसेल. त्यांना या योजनेतून वगळण्यात येते.
कशी कराल नोंदणी ?
या योजनेत नोंदणीसाठी दोन मार्ग आहेत. तुमच्याजवळील महा ई सेवा केंद्राला (CSC) भेट देऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. अथवा तुम्ही पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर थेट जाऊन अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण करू शकता.
या शेतकऱ्यांना नाही लाभ
ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.