‘फळ तोडणी’ ऐवजी ‘बाग तोडण्याची’च शेतकऱ्यावर नामुष्की, लाखोंचे नुकसान

| Updated on: Oct 12, 2021 | 12:35 PM

दोन दिवसांवर पपई या फळाची तोडणी होती पण या बागेतच पाणी साचल्याने पपई फळाची चवच गेली परिणामी फळ तोडणीच्या ऐवजी शेतकऱ्यावर फळबागेवरच कुऱ्हाड घालण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्च पदरी पडलेला नाही.

फळ तोडणी ऐवजी बाग तोडण्याचीच शेतकऱ्यावर नामुष्की, लाखोंचे नुकसान
नुकसान झालेल्या पपई फळबागेची तोडणी करताना शेतकरी
Follow us on

संभाजी मुंडे : परळी : मराठवाड्यातील शेतकरी येथील वातावरण अधिकचा खर्च टाळत पारंपारिक पीकावरच भर देत आलेला आहे. मात्र, काळाच्या ओघात आता पीक पध्दतीमध्ये बदल केला जात आहे. पण निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्याला सहन करावा लागत आहे. दोन दिवसांवर पपई या फळाची तोडणी होती पण या बागेतच पाणी साचल्याने पपई फळाची चवच गेली परिणामी फळ तोडणीच्या ऐवजी शेतकऱ्यावर फळबागेवरच कुऱ्हाड घालण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्च पदरी पडलेला नाही.

खरीप हंगामातील पारंपारिक पीकातून मुबलक प्रमाणात उत्पन्न मिळत नाही म्हणून परळी तालुक्यातील पांगरी येथील रामकृष्ण तिडके यांनी सव्वा एकरावर पपईची लागवड केली होती. वेळोवेळी औषध फवारणी आणि मशागतीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे फळही बहरात होते. मात्र, यंदा खरीपावर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. त्याचप्रमाणे फळपिकावरही या पावसाचा परिणाम झालेला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये परळी तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे वाण धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे फळपिकामध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळ तोडणी ऐवजी फळबागच आडवी करण्याचा प्रकार परळी तालुक्याती पांगरी येथे समोर आला आहे.

म्हणून केली होती पपईची लागवड

पारंपारिक पिकातून उत्पादन पदरी पडत नाही म्हणून शेतकरी हे अत्याधुनिकतेची कास धरत आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवून उत्पादन वाढीसाठी शेतकरी हे प्रयत्न करीत आहेत. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे अधिकचे उत्पादन तर नाहीच शिवाय यातून आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. खरीपातील पीकातून भरघोस उत्पादन मिळत नसल्याने परळी तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी रामकृष्ण तिडके यांनी पपईची लागवड केली होती. मात्र, पावसामुळे फळ पाण्यातच राहिले आहे. त्यांनी सव्वा एकर बाग जोपासण्यासाठी दीड लाखावर खर्च केला होता पण आता सर्वकाही पाण्यातच आहे.

दोन दिवसांनी होती फळाची तोडणी

योग्य पाण्याचे नियोजन आणि वेळीच औषध फवारणी केल्याने पपईची बाग बहरात होती. आता पपईची तोडणी ही दोन दिवसांवर आलेली होती. व्यापाऱ्यांकडून दरही ठरवण्यात आला होता. मात्र, परळी तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने वाण धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने…यांच्या पपईच्या फळबागेत पाणी साचलेले आहे. शिवाय फळ पाण्यात असल्याने नासलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे याची मागणी होणार नाही म्हणून रामकृष्ण तिडके यांनी बागच तोडून टाकली आहे.

लाखोंचे नुकसान

रामकृष्ण तिडके यांनी सव्वा एकरातील पपईची बाग जोपासण्यासाठी दीड लाखापर्यंत खर्च आला होता. आता दोन दिवसांनी तोडणी असल्याने या बागेतून तीन लाखाचे उत्पन्न मिळेल असा आशावाद शेतकरी रामकृष्ण तिडके यांना होता. मात्र, अधिकच्या पावसाने त्यांच्या स्वप्नावरही पाणी फेरले आहे. त्यामुळे आता भविष्यात अधिकचे पैसे खर्ची न करता पुन्हा पारंपारिक पिकावरच भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Rain damages papaya orchards, farmers lose lakhs of rupees)

संबंधित बातम्या :

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी, मग ‘हा’ आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय

15000 शेतकरी एकवटले अन् इतिहास घडला..

24 लाख खर्चून पॉलिहाऊस उभारलं, लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच नाही, शेतकऱ्याने फुलबागेवर नांगर फिरवला!