Sorghum Crop: उत्पादन क्षेत्र घटूनही ज्वारीच्या दरात घसरण, नेमके कारण काय?

| Updated on: Apr 27, 2022 | 4:16 PM

रबी हंगामातील ज्वारीच्या काढणी अंतिम टप्प्यात आहे. ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली असली पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. एकरी उतारा वाढला आहे. त्यामुळे हंगाम सुरु होऊन महिनाही उलटला नसताना येथील नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 20 हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. त्यातून पाच कोटी 71 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

Sorghum Crop: उत्पादन क्षेत्र घटूनही ज्वारीच्या दरात घसरण, नेमके कारण काय?
रबी हंगाम संपताच बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नंदुरबार : (Rabi Season) रबी हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. सर्वच पिकांची काढणी झाली असून खरिपाच्या अनुशंगाने शेती मशागतीची कामे सुरु आहेत. मात्र, ज्या (Sorghum Area) ज्वारीच्या क्षेत्रात ‘रेकॉर्ड ब्रेक’ घसरण झाल्याने किमान यंदा तरी दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण प्रत्यक्षात बाजारपेठेतील स्थिती ही वेगळीच आहे. हंगामाच्या सुरवातीलाच ज्वारीची आवक वाढली असल्याने नंदुरबार बाजार समितीमध्ये तब्बल 800 रुपयांची घसरण झाली आहे. (Nandurbar Market) नंदुरबार बाजार समिती रब्बी हंगामातील ज्वारी ला प्रतिक्विंटल 3 हजार ते 3 हजार 200 रुपयांचा भाव मिळत होता. आठवडाभरापासून ज्वारीच्या दरात 600 ते 800 रुपयाचे दर कमी झाल्याने सध्या बाजारपेठेत 2 हजार 200 ते 2 हजार 600 असा दर मिळाला आहे.

हंगामाच्या सुरवातीलाच 20 हजार क्विंटल ज्वारीची आवक

रबी हंगामातील ज्वारीच्या काढणी अंतिम टप्प्यात आहे. ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली असली पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. एकरी उतारा वाढला आहे. त्यामुळे हंगाम सुरु होऊन महिनाही उलटला नसताना येथील नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 20 हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. त्यातून पाच कोटी 71 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून रब्बी ज्वारी चा दर आला उतरती कळा लागली असून दर वाढतील या आशेने साठवून ठेवलेली ज्वारी आता शेतकऱ्यांना 600 ते 800 रुपये कमी दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

आवक वाढल्याने दरात घसरण

ज्वारी काढणी केल्यानंतर त्याची अधिकच्या काळासाठी साठवणूक केली जात नाही. ज्वारी केली की लागलीच विक्री केली जाते. त्यामुळे गेल्या महिन्याभरात नंदुरबार बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. शिवाय दरवर्षी ज्वारीला जास्तीचा दर राहतच नाही त्यामुळे शेतकरी काढणी झाली की लागलीच विक्री करण्यावर भर देतो. याचाच परिणाम आवकवर झाला आहे. शेतकरी सोयाबीन आणि कापसाप्रमाणे ज्वारीची साठवणूक करीत नाहीत. शिवाय साठवलेल्या ज्वारीला कीड लागण्याचा धोका असतो.

काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी झाली की लागलीच शेतकरी ज्वारीला बाजारपेठ दाखवितो. यंदा तर क्षेत्रामध्ये मोठी घट झाल्याने भविष्यात दर वाढणार आहे. निम्म्याने ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. वाढीव दराचा फायदा घ्यावयचा असल्यास शेतकऱ्यांनी काही दिवस का होईना ज्वारी साठवणूक करावी लागणार आहे. यंदा किमान 3 हजार 500 पर्यंत दर जातील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्याचे दर हे केवळ आवक वाढल्याने झाल्याचे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले आहे.