ग्राहकांचा खिसा रिकामा होणार! मीठ, चहासह टाटाच्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढणार; कंपनीकडून थेट संकेत
Tata Consumer Products : येत्या काही दिवसांत तुमच्या खिशावर महागाईचा भार वाढण्याची शक्यता आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढण्याचे संकेत दिले आहेत.

देशातील सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत तुमच्या खिशावर महागाईचा भार वाढण्याची शक्यता आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढण्याचे संकेत दिले आहेत. कच्च्या मालाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे कंपनी लवकरच आपल्या अनेक उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. याचा फटका देशातील लाखो ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने सांगितले की, उत्पादन खर्चात अशीच वाढ होत राहिली, तर नफा टिकवून ठेवण्यासाठी काही उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागू शकतात. यामध्ये चहा, मीठ आणि ब्रँडेड डाळींसारख्या दैनंदिन वापरातील अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. सध्या कंपनी बाजारातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून त्यानुसार पुढील रणनीती ठरवणार आहे.
किंमती का वाढू शकतात?
कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने कंपनीला आर्थिक फटका बसला आहे. तसेच मान्सूनला झालेल्या विलंबामुळे चहाच्या पानांच्या किमती वाढल्या आहेत. चहाच्या पानांच्या किमतीत सुमारे 7% ते 10% वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात टाटा चहाच्या किमती काही टक्क्यांनी वाढू शकतात.
कोणत्या उत्पादनांच्या किंमती वाढू शकतात?
- टाटा टी (चहा)
- टाटा सॉल्ट (मीठ)
- टाटा संपन्ना ब्रँडच्या डाळी
- इतर पॅकेज्ड खाद्यपदार्थ
कंपनीची कामगिरी कशी आहे?
गेल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 5,348.88 कोटी रुपये इतके होते. मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात सुमारे 12% वाढ झाली आहे. यात कंपनीचा निव्वळ नफा 444.86 कोटी रुपये झाला असून तो सुमारे 28% अधिक आहे.
कंपनीचा पुढील प्लॅन काय?
कंपनीने अलीकडेच चहाच्या किमतीत किरकोळ वाढ केली आहे. आता पुढील 15 ते 30 दिवस बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानंतर गरज भासल्यास उत्पादनांच्या किंमतीत आणखी बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. येत्या काळात उत्पादन खर्चात दिलासा मिळाला नाही, तर इतर उत्पादनांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. याचा फटका ग्राहकांना बसू शकतो.
