कोशिश करनेवालों की कभी हार नही होती ! Google ने 39 वेळा नाकारलं तरी करत राहिला नोकरीसाठी अर्ज, अखेर मिळालं यश !
टायलर कोहेन या व्यक्तीने जॉबसाठी गुगल कंपनीत 39 वेळा अर्ज केला मात्र तो नाकारण्यात आला. पण कोहेन याने हार न मानता नोकरीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 40 व्या प्रयत्नात त्याला यश मिळाले असून गुगलने त्याला नोकरी दिली आहे.
‘एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची जिद्द आणि वेडेपणा या दोहोंमध्ये अतिशय कमी अंतर असते. माझ्यात या दोन्हीपैकी काय आहे, याचा मी अजून शोध घेत आहे’, हे वाक्य म्हटले आहे टायलर कोहेन (Tyler cohen) या व्यक्तीने. आता हा टायलर कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टायलर कोहेन याने त्याच्या अथक प्रयत्नांनतर ‘गुगल’ (Google) कंपनीत नोकरी मिळवली आहे. तुम्हाला वाटेल त्यात काय मोठं? जगातील अनेक व्यक्तींनी गुगलमध्ये नोकरी मिळते, त्या टायलरला पण मिळाली असेल. तर असं नाही. हे प्रकरण हे एवढं साधं नाहीये. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणारा टायलर, गुगलमध्ये नोकरी (Job) मिळावी यासाठी गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याने तब्बल 39 वेळा अर्ज केला. मात्र दरवेळी त्याच्या पदरी केवळ निराशाच आली. गुगलने दरवेळेस त्याचे अर्ज रिजेक्ट करत त्याला नोकरी देण्यास नकार दिला. मात्र तरीही टायलरने हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर दोन वर्षांनी त्याला यात यश मिळाले असून गुगलने त्याचा 40 वा अर्ज स्वीकारत त्याला नोकरी दिली आहे.
‘लिंक्डइन’ या साईटवर टायलरने त्याचा अनुभव कथन केला आहे. टायलर कोहेन याने त्याच्या, आतापर्यंतच्या अर्जांचा एक स्क्रीनशॉटच शेअर केला असून आपल्याला 40 व्या प्रयत्नात यश मिळाल्याचे नमूद केले आहे. अमेरिकेतील फूड डिलीव्हरी कंपनी डोअरडॅशमध्य नोकरी करणाऱ्या टायलरने 2019 साली सप्टेंबर महिन्यात गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. मात्र त्याला अपयश मिळाले. त्यानंतर सतत 2 वर्ष तो नोकरीसाठी अर्ज करत होता आणि ते नाकारण्यात येत होते. अखेर 19 जुलै रोजी त्याचा अर्ज स्वीकारत गुगलने त्याला welcome म्हटले. यामुळे टायलर प्रचंड आनंदात असून ‘लिंक्डइन’वर त्याने स्क्रीनशॉट टाकत पोस्ट केली आहे.
गुगलनेही केले अभिनंदन
आतापर्यंत 30 हजारांहून अधिकांनी ही पोस्ट लाईक केली असून त्यावर 700 पेक्षा जास्त कॉमेंट्स आल्या आहेत. विशेष म्हणजे गुगलनेही त्याच्या या पोस्टची दखल घेत त्याचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच गुगलने कर्मचाऱ्यांच्या भरतीला चाप लावण्याचा निर्णय घेतला होता. गुगलची मूळ कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’चे (Alphabet) सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहीलेल्या ई-मेलमधून ही माहिती समोर आली. यंदा केवळ आवश्यक सेवा विभागासाठी कर्मचारी भरती सुरु राहील, असे पिचाई यांनी नमूद केले होते. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर गुगलने हे पाऊल उचलल्याचे समजते.