
आई-वडिलांसाठी त्यांची मुलं अतिशय प्रिय असतात, त्यांच्या काळजाचा तुकडाच जणू. त्यांच्यासाठी ते काहीही करू शकतात, मुलांसाठी आई-वडिलांनी केलेला त्याग, प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. पण नांदेडमध्ये एक असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय की त्यामुळे फक्त नांदेडच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. नांदेडमध्ये ऑनर किलींगची, भयानका हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. तिथे एका इसमाने त्याच्याच पोटच्या विवाहीत लेकीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केला . वडिलांवी मुलगी आणि प्रियकराचे हातपाय बांधून त्यांना क्रूरपणे विहीरीत फेकून दिलं.
यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच रपोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहीरीतून मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला, आणि ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांसह तीन जणांना बेड्या ठोकून अटक केली. आरोपींमध्ये तिच्या काकांचा आणि आजोबांचाही समावेश आहे.
तुमची मुलगी आम्हाला लागत नाहीत घरी घेऊन जा
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील ही हादरवणारी घटना आहे. संजीवनी सुधाकर कमळे (वय 19) आणि लखन बालाजी भंडारे (वय 19) अशी दोन्ही मृतांची नावं आहेत. संजीवनी विवाहीत होती तर लखनचं लग्न झालं नव्हतं. मात विवाहीत संजीवनीचे लखनशी प्रेमसंबंध होते. सोमवारी तो तिला भेटायला तिच्या सासरी गेला होता.
तेव्हा सासरच्या लोकांनी संजीवनी आणि लखन या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि ते पाहून ते संतापले. त्यांनी लखनला पकडून ठेवले आणि संजीवनीच्या वडिलांना, मारुती सुरणे यांना तिथे बोलावलं. मुलीच्या प्रेमप्रकरणाबद्दल समजताच मारूती लागलीच तिथे आले . तुमची मुलगी आम्हाला लागत नाहीत, तिला घरी घेऊन जा असं सागंत सासरच्या लोकांनी तक्रार करत तिला परत पाठवलं. संतप्त मारूती हे संजीवनी आणि तिच्या प्रियाकराला घेऊन गावाकडे गेले. यावेळी त्यांच्यासोबत मुलीचे काका आणि आजोबाही होते.
झालेल्या प्रकारामुळे संतप्त मारूती यांनी संजीवनी आणि तिच्या प्रियकराचा हातपाय बांधले आणि त्यांना विहीरात फेकून दिलं, त्यांचा खून केला. नंतर त्यांनी स्वत:च पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या घटनेची कबूली दिली.यानंतप पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली. तसेच घटनास्थळ गाठून रात्री 12 वाजेपर्यंत मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा, दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.