मन सुन्न करणारी घटना!, मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला जिवंत जाळले

Parbhani Crime News: मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत घडली आहे. वडिलांच्या या कृत्यामुळे तीन चिमुकल्यांचे छत्र हरवले आहे. कुंडलिक काळे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.

मन सुन्न करणारी घटना!, मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला जिवंत जाळले
क्राईम न्यूज
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 28, 2024 | 7:46 PM

Crime News: आपण 21 व्या शतकात आलो आहोत. मुलगा-मुलगी एकसमान अशा गप्पा केल्या जात आहेत. महिलांना सर्वत्र समान अधिकार दिले जात आहे. परंतु अजूनही मुलगा अन् मुलगी यांच्यातील भेद कायम असल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. परभणीमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत घडली आहे. वडिलांच्या या कृत्यामुळे तीन चिमुकल्यांचे छत्र हरवले आहे. कुंडलिक काळे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.

बहिणीने सांगितले नेमके काय घडले?

परभणी शहरातील गंगाखेड नाक्याजवळ गुरुवारी ही घटना घडली. या घटनेची आपबिती सांगताना फिर्यादी बहीण भाग्यश्री काळे यांना अश्रू आनावर झाले. त्या म्हणाल्या, मुली झाल्या म्हणून माझ्या बहिणीचा नवरा सतत मारहाण करत होता. तो बहिणीला मुलगा का जन्माला घालत नाही? असे सवाल नेहमी करत होता. तिला मारहाण करत होता. या विषयावरुन गुरुवारी रात्री त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाली. त्यानंतर त्याने माझ्या बहिणीला पेट्रोल टाकून जाळले. त्यालाही तसेच पेट्रोल टाकून जाळण्यात यावे, किंवा त्याला फाशी देण्यात यावी. तसेच या तीन मुलीच्या संगोपनाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणी भाग्यश्री काळे यांनी सांगितले.

घटनेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक ननवरे यांनी सांगितले की, आरोपीला अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी पाहिले आहेत. पुरावे जमा केले आहेत. आरोपीस कडक शिक्षा होईल त्या अनुषंगाने तपास करत आहोत.

दरम्यान पीडित कुटुंबियांची आमदार राहुल पाटील भेट घेतली. तसेच त्यांनी साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, महिलेला जळण्याचे दुर्दैवी काम नराधमाने केले आहे. मुलगी झाल्यानंतर दुय्यम वागणूक मिळायला नको आहे. या दुर्दैवी घटनेत मी मुख्यमंत्र्यांना बोललो आहे. पंचनामाचा रिपोर्ट तयार केला आहे. शासनाकडून 50 लाखांची मदत त्या लहान तीन मुलींना करावी, अशी मागणी केली आहे.