रात्रभर बायकोशी संपर्क नाही, पहाटे मेसेज आणि व्हिडीओ… त्यानंतर टायगर पॉइंटवरून थेट… पत्नीच्या वाढदिवशीच घडलं अघटित !
लोणावळ्यात एका धक्कादायक घटनेत, पत्नीच्या वाढदिवशीच पतीने आत्महत्या केली. हिंजवडीत नोकरी करणाऱ्या वीरेंद्र सिन्हा यांनी पत्नीशी झालेल्या वादामुळे आणि संपर्क साधता न आल्याने तणावातून टायगर पॉईंटवरून उडी घेतली. पत्नीला शेवटचा मेसेज आणि व्हिडिओ पाठवून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. लोणावळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवरा बायकोचं नातं हे विश्वासाचं नातं असतं. दोघांनीही एकमेकांना सुखदु:खात साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या असतात. केवळ आणि केवळ एकमेकांच्या विश्वासावरच हे नातं टिकून असतं. संसाराचा गाडा हाकताना या नात्यात कधी कधी मिठाचा खडा पडतो. पण अशावेळी दोघांपैकी एकाने एक पाऊल मागं टाकून दोन पावलं पुढं जाणंच नेहमी सोयीस्कर असतं. पण ते होताना दिसत नाही. अनेकदा टोकाची भांडणं होतात आणि मग थेट जीवनाचा अंत होण्यापर्यंत गोष्ट जाते. भांडणं शुल्लक असतात. पण त्याचा मनस्ताप फार मोठा असतो. जीवघेणा असतो. लोणावळ्यात असाच जीवघेणा प्रकार घडला. हसऱ्या खेळत्या संसराला कुणाची तरी नजर लागावी असं घडलं आणि क्षणार्धात सर्व काही कोलमडलं. असं काय घडलं त्या दोन जीवांमध्ये?
पत्नीचा वाढदिवस आणि त्याच दिवशी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना लोणावळा येथे घडली आहे. वीरेंद्र सिन्हा असे मृत व्यक्तीचे नाव असून ते सध्या हिंजवडी येथे नोकरी करत होते. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. 12 फेब्रुवारी रोजी पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीपासून त्यांनी पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंबर ब्लॉक असल्याने संभाषण होऊ शकले नाही. पहाटेच्या सुमारास त्यांनी पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर टायगर पॉईंट येथून सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उडी घेतली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. वीरेंद्र सिन्हा हे हिंजवडीत कंटेनर सेल विभागात कार्य करत होते.
काय घडलं नेमकं?
वीरेंद्र सिन्हा हे पुण्यात पत्नीसोबत राहत होते. क्षुल्लक कारणावरून त्यांचे पत्नीसोबत भांडण झालं. त्यानंतर ते घरा बाहेर पडले. पण नंतर संध्याकाळपासून त्यांनी पत्नी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण नंबर ब्लॉक असल्याने संपर्क झाला नाही. त्यांनी रात्रीपर्यंत प्रयत्न केले. पण संपर्कच झाला नाही. त्यामुळे वीरेंद्र अधिकच तणावात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर पहाटे लायन्स पॉइंट येथे त्यांची चारचाकी गाडी संशयास्पदरित्या आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आणि वीरेंद्र यांनी टायगर पॉइंटवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं आढळून आलं.
लोणावळा पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. ज्या ठिकाणी वीरेंद्र यांची कार उभी होती, त्यासमोरी 250 फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. शिवदुर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने शोधाशोध घेऊन त्यांचा मृतदेह शोधून काढला.
पत्नीला मेसेज, व्हिडीओ
दरम्यान, मृत्यूपूर्वी वीरेंद्र यांनी त्यांच्या पत्नीला मेसेज आणि व्हिडीओ केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या व्हिडीओत त्यांनी नेमकं काय म्हटलं? आणि काय मेसेज आहे? याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच वीरेंद्र यांनी मृत्यूपूर्वी मित्रांनाही ई-मेल आणि मेसेजद्वारे काही टोकाचे संकेत दिले होते, अशी माहिती समोर आली असून पोलीस त्याचाही छडा लावत आहेत.
