“हॅलो पोलीस स्टेशन? माझा बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये” व्याकुळ प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?

| Updated on: Nov 20, 2021 | 10:01 AM

काही दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस होता. मात्र त्या दिवशी मुलगी काही कारणास्तव त्या मुलाशी बोलू शकली नाही. यावरुन त्यांच्यात भांडण झाले आणि मुलाने मुलीशी बोलणे बंद केले

हॅलो पोलीस स्टेशन? माझा बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये व्याकुळ प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात प्रियकर-प्रेयसीच्या भांडणाची एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणीने तिचा प्रियकर तिच्याशी बोलत नसल्याची तक्रार पोलिसांकडे केली. अखेर छिंदवाडा पोलिसांनी मध्यरात्री दोघांना बोलवून घेतले आणि त्यांच्यात समेट घडवून त्यांचा विवाह लावून दिला.

नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये, असं सर्रास म्हटलं जातं. कारण भांड्याला भांडं लागतं, तेव्हा दोघांची तोंड दोन दिशांना जातात. मात्र कुणाला कळायच्या आता दोघांमध्ये गोडी गुलाबी होते, आणि मध्यस्थी करणारा राहतो बाजूला. नवरा-बायको खुशालीने पुन्हा एकत्र नांदू लागतात. मध्य प्रदेशात असंच काहीसं घडलं, मात्र गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डच्या बाबतीत.

नेमकं काय घडलं?

त्याचं झालं असं की, मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील एका मुलीचे सरानी येथील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस होता. मात्र त्या दिवशी मुलगी काही कारणास्तव त्या मुलाशी बोलू शकली नाही. यावरुन त्यांच्यात भांडण झाले आणि मुलाने मुलीशी बोलणे बंद केले, अशी माहिती सीएसपी मोतीलाल कुशवाह यांनी दिली.

प्रियकराने बोलणे टाकले

मुलीने चिडलेल्या प्रियकरापर्यंत पोहोचण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्याने बोलणं टाकलं ते टाकलंच. तो काही तिच्याशी पुन्हा संवाद साधायच्या मनस्थितीत नव्हता. मात्र बॉयफ्रेण्डच्या पवित्र्याने तरुणी चांगलीच व्यथित झाली. पुढे काय करायचं याची कल्पना तिला नव्हती.

पोलिसांना 100 नंबरवर कॉल

ज्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्नं रंगवली, तोच अचानक बोलेनासा झाल्याने तरुणीची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली. काही न सुचल्याने मुलीने अखेर पोलिसांना 100 नंबरवर कॉल केला आणि पोलिसांनाच गळ घातली की त्यांनी प्रियकराला आपल्याशी बोलण्यास सांगावे.

आता भल्याभल्या गुन्हेगारांना बोलते करणारे पोलिसही या विचित्र फोन कॉलमुळे बुचकळ्यात पडले. काय करावं ते त्यांनाही समजेना. पण तिला मदत तर करायची होती. मदतीसाठी पोलिसात पोहोचलेल्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलाला पोलिस ठाण्यात बोलावले. मध्यरात्री झालेल्या समुपदेशनाच्या सत्रानंतर पोलिसांनी त्यांच्यात समेट घडवून आणला आणि दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला. दोघांच्याही घरातील सदस्यांनीही होकार दिला आणि जोडप्याने आर्य समाज मंदिरात लग्नाच्या आणाभाका घेतल्या.

संबंधित बातम्या :

बिर्याणीच्या दुकानात 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अंबरनाथमध्ये खळबळ

धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह

पोलीस असल्याचं सांगून प्रेमी युगुलाचे फोटो काढले, नंतर प्रियकरासमोरच प्रेयसीवर बलात्कार