कारच्या धडकेनंतर बाईक 60 फूट उंच हवेत उडाली, महिलेचा जागीच मृत्यू, औरंगाबादेत अपघाताचा थरार

| Updated on: Sep 20, 2021 | 8:41 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदरा एमआयडीसीतील हरमंड कंपनी समोर हा भीषण अपघात झाला. कार आणि दुचाकीचा भीषण धडक झाल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले.

कारच्या धडकेनंतर बाईक 60 फूट उंच हवेत उडाली, महिलेचा जागीच मृत्यू, औरंगाबादेत अपघाताचा थरार
औरंगाबादमध्ये भीषण अपघात
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कार आणि बाईकचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. कारच्या धडकेनंतर बाईक सुमारे
60 फूट उंच हवेत उडाल्याचं सांगितलं जातं. यामध्ये दुचाकीस्वार वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह तिघे जण गंभीर जखमी झाली आहेत.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदरा एमआयडीसीतील हरमंड कंपनी समोर हा भीषण अपघात झाला. कार आणि दुचाकीचा भीषण धडक झाल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले. हा अपघात इतका भीषण होता, की कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर ती हवेत 60 फूट उंच उडाली असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

कार आणि बाईकचा चुराडा

या अपघात दुचाकीवरील 60 वर्षीय महिला जागेवरच मृत्युमुखी पडली, तर दोन लहान मुलं आणि एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात कारच्या एका बाजूचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. तर बाईकचाही चुराडा झाल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

औरंगाबादेत आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांना जागेवरच आपला जीव गमवावा लागला आहे. औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही तरुणांचे जागेवरच प्राण गेले. अपघातानंतर आयशर ट्रक चालक फरार झाला आहे. मयत दोन्ही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ या गावातील रहिवासी आहेत.

अंबरनाथमध्ये कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

दरम्यान, अंबरनाथमध्ये 12 सप्टेंबरला संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी तिघे एकाच कुटुंबातील सदस्य होते.

पुण्यात बाईक पुलाच्या कठड्याला धडकून अपघात

तर दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या वेळी बाईकने निघालेल्या तरुणांना पुण्यात अपघात झाला होता. कर्वेनगर भागातील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघाही बाईकस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

पुण्याच्या कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने अपघात होऊन वारजे भागातील दोन तरुणांना प्राण गमवावे लागले. शंकर इंगळे (वय 27 वर्ष) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय 20 वर्ष, दोघे रा. वाराणसी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी मयत तरुणांची नावं आहेत. गेल्या बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक

आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू