वायर जोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक खांबावर चढवलं, विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

कोपर्ली सबस्टेशनवरुन वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र अचनाक कोपर्ली सबस्टेशनवरुन वीज पुरवठा सुरु केल्याने पंकजसिंग गिरासे यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

वायर जोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक खांबावर चढवलं, विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू
नंदुरबारमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 11:44 AM

नंदुरबार : विद्युत खांबावर चढलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने (Electric Shock) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 30 वर्षीय पंकज दरबारसिंग गिरासे याला प्राण गमवावे लागले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे वायर जोडण्यासाठी तो विद्युत पोलवर चढल्याची माहिती आहे. नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील अमळथे शिवारात ही घटना घडली आहे. सबस्टेशनवरुन वीज पुरवठा सुरु केल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. जळून कोळसा झालेला तरुणाचा मृतदेह विजेच्या खांबावरच काही काळ लटकत होता. महावितरण कंपनीच्या निष्काळजीमुळे पंकजसिंग गिरासे या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.

काय आहे प्रकरण?

तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मुत्यू झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील अमळथे शिवारात घडली आहे. अमळथे शिवारात विद्युत रोहित्र जळाले असताना रोहित्र जोडण्याचे काम शुक्रवारी सुरु होते. यावेळी अमळथे येथील पंकज दरबारसिंग गिरासे (वय 30 वर्ष) या युवकाला महावितरण कर्मचाऱ्यांनी पोलवर चढवून वायर जोडण्यास सांगितले. यासाठी कोपर्ली सबस्टेशनवरुन वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र अचनाक कोपर्ली सबस्टेशनवरुन वीज पुरवठा सुरु केल्याने पंकजसिंग गिरासे यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

ग्रामस्थांचा सब स्टेशनला घेराव

घटनेची माहिती मिळता ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पंकजसिंग गिरासे या युवकाचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटना घडल्यानंतर सुमारे चार तासांपर्यंत कुठलाही महावितरणचा अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता. नंतर ग्रामस्थांनी कोपार्ली येथील सब स्टेशनला घेराव घालत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ त्या ठिकाणी थांबून होते. पोलीस दलाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयात ग्रामस्थ गोळा झाले असून एमएसईबी कार्यालयात तरुणाचा मृतदेह नेण्याच्या भूमिकेवर नातेवाईक आणि ग्रामस्थ ठाम आहेत. एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात बोलावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण, हायव्होल्टेज तारांचा झटका, 30 वर्षीय अमोल पाटीलसह तिघे गतप्राण

पतंगाच्या मागे धावला नि होत्याचे नव्हते झाले; नागपुरात विजेच्या धक्क्याने गमावला जीव!