साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाला निघालेल्या साताऱ्याच्या महिला बाईक रायडरला अपघात, टँकर डोक्यावरुन गेल्याने मृत्यू

| Updated on: Oct 12, 2021 | 1:59 PM

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या होत्या. नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्याची ही मोहीम होती.

साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाला निघालेल्या साताऱ्याच्या महिला बाईक रायडरला अपघात, टँकर डोक्यावरुन गेल्याने मृत्यू
Follow us on

नांदेड : साताऱ्यातील हिरकणी ग्रुपच्या महिला बाईक राईड करत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र या ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. 32 वर्षीय शुभांगी यांचे नांदेडजवळ अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे अपघाती निधन झाले. बाईकवरुन पडल्यानंतर टँकर डोक्यावरुन गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सातारा येथील हिरकणी ग्रुप

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या होत्या. नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्याची ही मोहीम होती. त्यांनी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. तिथून तुळजापूरला आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

नांदेडमध्ये टँकर चालकाची धडक

माहूर गडावर रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा दाभड येथे टँकर चालकाने जोरदार धडक दिली. बाईकवरुन पडल्यानंतर टँकर डोक्यावरुन गेल्यामुळे शुभांगी पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर जि. नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले आहे.

टँकर ताब्यात

अपघातानंतर पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक कपील अगलावे, पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे, महामार्गाचे रमाकांत शिंदे, गजानन डवरे, वसंत सिनगारे, मृत्यूंजय दूत गोविंद टेकाळे यांनी मदत केली. टँकर जि. जे. 12 ए.टी. 6957 हा टँकर अर्धापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

औरंगाबादेत आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांना जागेवरच आपला जीव गमवावा लागला आहे. औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही तरुणांचे जागेवरच प्राण गेले. अपघातानंतर आयशर ट्रक चालक फरार झाला आहे. मयत दोन्ही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ या गावातील रहिवासी आहेत.

अंबरनाथमध्ये कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

दरम्यान, अंबरनाथमध्ये 12 सप्टेंबरला संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी तिघे एकाच कुटुंबातील सदस्य होते.

पुण्यात बाईक पुलाच्या कठड्याला धडकून अपघात

तर दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या वेळी बाईकने निघालेल्या तरुणांना पुण्यात अपघात झाला होता. कर्वेनगर भागातील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघाही बाईकस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

पुण्याच्या कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने अपघात होऊन वारजे भागातील दोन तरुणांना प्राण गमवावे लागले. शंकर इंगळे (वय 27 वर्ष) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय 20 वर्ष, दोघे रा. वाराणसी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी मयत तरुणांची नावं आहेत. गेल्या बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक

आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू