डोंबिवलीतील रिक्षा प्रवासी हत्या प्रकरणात ट्विस्ट, वडिलांच्या मानसन्मानावरुन वाद, तक्रारदार मित्रच मारेकरी

| Updated on: Oct 07, 2021 | 7:54 AM

बबलू यानेच आपला मित्र बेचन प्रसादची हत्या केल्याची कबुली दिली. या दोघांमध्ये सोमवारी संध्याकाळी आपल्या वडिलांचा जास्त आदर कोण करतो, यावरुन वाद झाला. आपण गावी जाऊन एकमेकांच्या वडिलांना विचारायचे की कोण तुम्हाला जास्त सन्मान देतो, असे त्यांनी ठरवले.

डोंबिवलीतील रिक्षा प्रवासी हत्या प्रकरणात ट्विस्ट, वडिलांच्या मानसन्मानावरुन वाद, तक्रारदार मित्रच मारेकरी
डोंबिवलीतील प्रवासी हत्या प्रकरणाला वळण
Follow us on

कल्याण : डोंबिवलीतील प्रवासी हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मित्रानेच मित्राची हत्या करुन स्वतःच्या बचावासाठी लुटीचा दावा केला. टिळकनगर पोलिसांनी बबलू चौहान याचा बनाव उघड करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कोण आपल्या वडिलांना जास्त सन्मान देतो, या कारणावरुन दोघांमध्ये भांडण झालं, दारुच्या नशेत बबलूने बेचन प्रसादची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून दिला होता.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पूर्व शेलार नाका परिसरात राहणारे बेचन प्रसाद चौहान आणि त्याचा मित्र बबलू चौहान हे दोघे सोमवारी रात्री आपल्या गावी उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघाले होते. मंगळवारी सकाळी बबलू हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासोबत टिळक नगर पोलीस ठाण्यात पोहोचला. लुटीच्या इराद्याने तीन जणांनी रिक्षामधून खाली उतरून मला आणि माझ्या मित्राला मारहाण केली, मी कसाबसा वाचून आलो आहे. माझा मित्र अजून सापडलेला नाही, असं बबलूने पोलिसांना सांगितले.

घटनास्थळी बॅग, लुटीच्या दाव्यावर पोलिसांना संशय

घटना कुठे घडली आहे हे पाहण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि पोलीस ठाकुर्ली येथील खंबाळपाडा परिसरात असलेल्या 90 फीट रोडवर पोहोचले. बेचन प्रसाद यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. बबलूच्या सांगण्यानुसार बेचन याची हत्या लुटारुंनी केली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र लूट झाली असली तरी दोघांची बॅग आणि मोबाईल घटनास्थळी सापडल्याने नक्की लूट करण्यासाठी हा प्रकार घडला का, असा संशय पोलिसांना होता.

बबलूचा उलटसुलट जबाब

या दृष्टीने डोंबिवलीच्या जीआरपी पोलिसांनी आणि टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला. जखमी बबलूकडे पोलिसांनी विचारपूस सुरू केली. मात्र बबलू पोलिसांना उलटसुलट जबाब देत होता. यावरुन पोलिसांना संशय आला. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जे. डी. मोरे, टिळकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला.

वडिलांच्या मानसन्मानावरुन वाद

चौकशी दरम्यान बबलू यानेच आपला मित्र बेचन प्रसादची हत्या केल्याची कबुली दिली. या दोघांमध्ये सोमवारी संध्याकाळी आपल्या वडिलांचा जास्त आदर कोण करतो, यावरुन वाद झाला. आपण गावी जाऊन एकमेकांच्या वडिलांना विचारायचे की कोण तुम्हाला जास्त सन्मान देतो, असे त्यांनी ठरवले.

धारदार शस्त्राने हत्या

गाव गाठण्यासाठी दोघे उत्तर प्रदेश येथील सिद्धार्थनगर जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले. दोघांनी दारु प्यायली. मात्र खंबाळपाडा परिसरात असलेल्या 90 फिट रोडवर त्यांचे या मुद्द्यावरुन परत भांडण झाले. या वादात बबलूने आपल्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने बेचनची हत्या केली. त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून तो पसार झाला.

रात्री बबलू घरी जाऊन झोपला आणि सकाळी लुटीच्या बनाव करुन पोलीस स्टेशनला पोहोचला, मात्र त्याचा हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. त्यानंतर टिळक नगर पोलिसांनी बबलूला डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास डोंबिवली रेल्वे पोलीस करणार आहेत .

इतर बातम्या

रिक्षामधून दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले, बेदम मारहाण करीत एकाचा गळा कापला; डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

माळीवाड्यातील पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई, औरंगाबादनंतर नाशिक, गुजरातेतही लूटमार

पोलिसाची फोनवरुन धमकी, भीतीपोटी तरुणाची विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या