नागपूर हिंसाचारातील या मास्टरमाइंडच्या भाषणानंतर समाजकंटकांचा राडा, पोलिसांनी त्याच्या आवळल्या मुसक्या
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारामागे मुख्य आरोपी 38 वर्षीय फहीम शमीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तो शमीम मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे. त्याने 2024 मधील लोकसभा निवडणूक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी याच्या विरोधात लढली होती.

Nagpur Violence: नागपूर शहरात दोन दिवसांपूर्वी मोठा हिसांचार झाला होता. विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर शांत शहर असणारे नागपूर संध्याकाळी अचानक पेटले. हा सर्व सुनियोजित कट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणातील मास्टरमाइंडचे नाव समोर आले होते. फहीम शमीम खान नावाच्या या मास्टरमाइंडच्या भाषणानंतर जमाव भडला आणि त्यांनी मोठा हिंसाचार घडवला. आता नागपूर पोलिसांनी फहीम खान या मास्टरमाइंडला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
नागपूर हिंसाचारामागे मुख्य आरोपी 38 वर्षीय फहीम शमीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तो शमीम मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे. त्याने 2024 मधील लोकसभा निवडणूक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी याच्या विरोधात लढली होती. पोलिसांच्या तपासातून त्याने जहाल भाषण केल्याचे समोर आले आहे. त्याच्या भाषणानंतर जमाव हिंसक झाला. त्यानंतर नागपूरमधील काही भागातील घरे आणि वाहने जाळण्यात आली. या प्रकारात दाखल गुन्ह्यात फहीम खान याचे नाव आहे. तो नागपूरमधील संजय बाग कॉलनीतील यशोधरा नगरमध्ये राहतो.
गडकरी विरोधात लढवली होती निवडणूक
नितीन गडकरी यांच्या विरोधात फहीम खान याने लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्याचा दारुन पराभव झाला. निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर तो राजकारणात सक्रीय झाला. शहरात आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न तो करु लागला. नागपुरातील हिंसाचाराचा कट आधीच रचला गेल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. फहीम खान यानेच काही कट्टरपंथी लोकांना एकत्र करुन सुनियोजित पद्धतीने हिंसाचार घडवल्याचा पोलिसांनी आरोप आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 60 पेक्षा जास्त समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या लोकांनी पोलिसांवरही हल्ला केला होता. तसेच आंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग केला होता. हिंसाचाराच्या या घटनेनंतर आता नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. बाजारपेठांमध्ये अजूनही शुकशुकाट आहे.
