तुरुंग अधिकाऱ्याचा मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार, पानटपरीवर गेला आणि रक्तबंबाळ होऊन आला, काय घडलं?
नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढलं आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवालही नागरिक उपस्थित करू लागले आहे.
नाशिक : सध्या नाशिक पोलिस काय करताय? असा संतप्त सवाल नागरिकांना पडू लागला आहे. गुन्हेगारांवर धाक राहिला नाही का ? अशी चर्चाही नाशिक शहरातील ( Nashik News ) नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. नुकताच नाशिकरोड आणि पंचवटी येथील हल्ल्याची घटना ताजी असतांनाच नाशिकरोड परीसरात एक गंभीर घटना ( crime News ) समोर आली आहे. एका तरुण पान घ्यायला गेल्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हा युवक नाशिकच्या मध्यवर्ती कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांचा मुलगा आदित्यावर हल्ला झाला आहे. पान घ्यायला गेलेला तरुन अक्षरशः रक्तबंबाळ झाला असून त्याचे नाकाचे हाड फ्रैक्चर झाले आहे.
आदित्य हा जेवण झाल्यानंतर दुचाकीवरुन शिवाजीनगर येथे पानटपरीवर पान घेणीसाठी गेला होता. दोन साधे पान घेतल्यानंतर आदित्य याने किती पैसे झाले म्हणून विचारणा केली. त्यात पान टपरी चालक याने 70 रुपये झाल्याचे म्हंटले. त्यावर आदित्य याने इतके पैसे कसे झाले असा प्रश्न केला.
त्यानंतर आदित्य याला पानटपरी चालक याने पान घ्यायचे तर घे नाहीतर निघून जा म्हणत शिवीगाळ केली. त्यावर आदित्यने शिवी का दिली म्हणून विचारणा केली. त्यानंतर त्याचा राग आलेल्या पान टपरीचालक मित्राने बाजूला बसलेल्या मित्रांना बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली.
यामध्ये दुसरी एक बाब म्हणजे मारहाण करत असतांना नाकावर आणि डोक्यावर लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये आदित्यच्या नाकाचे हाड तुटले आहे. मारहाण झाल्यानंतर आदित्यने आपल्या आईला फोन केला. त्यामध्ये आदित्य घेण्यासाठी गेलेल्या आईलाही मारेकऱ्यांनी शिवीगाळ केली आहे.
हा संपूर्ण प्रकार एका कारागृहाच्या अधिक्षकांच्या मुलाच्या बाबतीत घडल्याने खळबळ उडाली असून ठिकठिकाणी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात जबरी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर अद्यापही फरार असून पोलिसांचा तपास सुरू आहे.