पुण्यातील बिल्डरकडे खंडणीची मागणी, शेतकऱ्यासह दोन मुलांना अटक

| Updated on: Sep 13, 2021 | 2:36 PM

तिघे आरोपी बांधकाम व्यावसायिकाला त्यांच्याकडूनच सर्व साहित्य खरेदी करण्यास भाग पाडत होते. जेव्हा तक्रारदाराने त्यांना नकार दिला, तेव्हा त्यांनी त्याच्या ठेकेदारांना धमकी दिली आणि त्यांच्याकडून 75,000 रुपये घेतले

पुण्यातील बिल्डरकडे खंडणीची मागणी, शेतकऱ्यासह दोन मुलांना अटक
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पिंपरी चिंचवड : एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पिंपरी चिंचवड पोलिसांनी 46 वर्षीय शेतकरी आणि त्याच्या दोन मुलांना रविवारी अटक केली. तिघे आरोपी आपल्याला गेल्या पाच महिन्यांपासून त्रास देत असल्याचे बिल्डरने आपल्या तक्रारीत म्हटले होते. आपल्या दोन कंत्राटदारांकडून त्यांनी 75 हजार रुपये उकळल्याचा दावाही बिल्डरने केला होता.

संशयित सत्यवान तापकीर आणि त्यांची मुलं आकाश (25) आणि सागर (23) यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती दिघी पोलिस उपनिरीक्षक सुनील भदाणे यांनी दिली. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

“तिघे आरोपी बांधकाम व्यावसायिकाला त्यांच्याकडूनच सर्व साहित्य खरेदी करण्यास भाग पाडत होते. जेव्हा तक्रारदाराने त्यांना नकार दिला, तेव्हा त्यांनी त्याच्या ठेकेदारांना धमकी दिली आणि त्यांच्याकडून 75,000 रुपये घेतले” असेही भदाणे म्हणाले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली आणि त्याच्या वाहनांची तोडफोड करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

ठाण्यात पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या

दुसरीकडे, पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या करुन त्याला घराजवळ पुरल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपींनी खंडणीची मागणी केल्याचंही उघडकीस आलं आहे.

ठाण्याचे व्यावसायिक हणमंत शेळके हे 1 सप्टेंबरला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कुटुंबियांनी 1 सप्टेंबरला कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती. या दरम्यान आरोपींनी शेळके यांच्या कुटुंबियांना फोन करत खंडणीची मागणी केली. शेळके यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

विशेष म्हणजे आरोपी हे शेळके यांच्याच मोबाईलवरुन फोन करत होते. त्यामुळे त्यांचा शोध लागणं कठीण झालं होतं. पण आरोपींचा जेव्हा दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा पोलीस सतर्क झाले. त्यांनी तांत्रिक आधारावर तपास करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यानंतर आरोपींनी सर्व गुन्हा कबूल करत पोलिसांना आपल्या कृत्यांची माहिती दिली.

अपहरण करत त्याच दिवशी शेळके यांची हत्या

पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती. आरोपींनी मृत हणमंत शेळके यांचं अपहरण केलं. त्याच दिवशी त्यांनी शेळके यांची अमानुषपणे हत्या केली. आरोपींनी शेळके यांचं मृत शरीर खोलीच्या मागेच चार फूट खोल खड्ड्यात मोकळ्या जागेत पुरलं. त्यानंतर शेळके यांच्याच मोबाईलवरुन फोन करत खंडणीची मागणी केली. घाबरेल्ल्या कुटुंबियांनी पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला.

आरोपी शेळके यांच्याकडे मजुरीचे काम करायचे

पोलिसांनी मोबाईल ट्रेस करुन आठ दिवसात आरोपींचा छडा लावला. हे सर्व आरोपी परप्रांतीय आहेत. त्यांच्यातील तिघेजण पळून गेले आहेत. तर आरोपी शिवा वर्मा आणि सुरज वर्मा हे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ते हेमंत शेळके यांच्याकडे मजुरीचे कामं करत होते. पैशांच्या हव्यासापायी त्यांनी शेळके यांचे अपहरण करुन हत्या केली.

हेही वाचा :

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

अमरावतीत पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 7 वर्षीय चिमुकलीवर 20 वर्षीय युवकाचा बलात्कार