आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने 2026-2027 देशांतर्गत स्पर्धेसाठी काही कठोर नियम लागू केले आहे. यात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे नो बॉल.. जर खेळाडूने जाणीवपूर्वक नो बॉल टाकला त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नियमात कठोर बदल केले आहेत. 2026-27 च्या देशांतर्गत क्रिकेट पर्वापूर्वी बीसीसीआयने खेळाच्या नियमात महत्त्वपूर्ण बदले केले आहेत. आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकणाऱ्या गोलंदाजाला संपूर्ण सामन्यातून निलंबित केलं जाणार आहे. यात जाणूनबुजून फ्रंट फूट नो बॉल टाकल्यास संपूर्ण सामन्यासाठी गोलंदाजावर बंदी घालण्याची तरतूद केली आहे. तसेच सुधारित खेळण्याच्या नियमात बदल करताना दिवसाच्या खेळाचे शेवटचे षटक, डाव घोषित करणे किंवा सोडून देणे, विकेटकीपिंगचे नियम आणि ड्रिंकस ब्रेक दरम्यान प्रशिक्षकाच्या भूमिका यांचाही समावेश केला आहे. देशांतर्गत हंगामाची सुरूवात पुढच्या महिन्यात दुलीप ट्रॉफीने होणार आहे. त्यामुळे या नियमांची चर्चा आहे. नो बॉल नियम काय आहे आणि आधी काय तरतूद होती हे सविस्तर जाणून घेऊयात..
जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर…
नो बॉल प्रकरणात यापूर्वी गोलंदाजाला फक्त संबंधित डावापुरता गोलंदाजीपासून रोखलं जात होतं. पण बीसीसीआयने आता मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचवलेल्या सुधारणांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळण्याच्या अटीमध्ये नियम 41.8 मध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार गोलंदालाजा संपूर्ण सामन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय मैदानातील पंच घेतील. जाणीवपूर्वक फ्रंट-फूट नो-बॉल टाकल्यास किंवा खेळपट्टीवर न पडणारा चेंडू टाकल्यास दोषी आढळलेल्या गोलंदाजाला उर्वरित सामन्यासाठी गोलंदाजी करण्यास मनाई केली जाईल.
दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडली तर…
दुसरीकडे, बीसीसीआयने नियम 12.5.2 मध्ये देखील बदल केला आहे. आता दिवसाचे शेवटचे षटक खेळताना विकेट पडली तरी ते षटक पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी नियोजित अंतिम षटकात विकेट पडली तर पंच खेळ थांबवू शकत होते.
डाव घोषित करताना….
इतकंच काय तर संघांना सामन्याचा अंतिम डाव घोषित करण्यास किंवा सोडून देण्यासही बंदी घातली आहे. नियम 15.2 मध्ये बदल करण्यात आला असून आहे. यापूर्वी कृत्रिम निकाल मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला जात होता. त्यामुळे खेळभावनेला ठेच पोहोचत होती.
ड्रिंक्स ब्रेकमध्ये प्रशिक्षक आखणार रणनिती
वनडे सामन्यात संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला आता ड्रिंक्स ब्रेक दरम्याने मैदानात प्रवेश करता येणार आहे. आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा नियम लागू करण्याचा आधीच प्रस्ताव दिला आहे.
विकेटकीपिंगच्या नियमात बदल
विकेटकीपरला नव्या नियमात दिलासा देण्यात आला आहे. यापूर्वी गोलंदाजी गोलंदाजीसाठी धाव घेण्यापासून विकेटकीपरला ग्लव्ह्ज स्टम्पमागे ठेवावे लागत होते. जर तसं केलं नाही तर नो बॉल दिला जायचा. तसेच स्टम्पिंग अमान्य केली जायची. पण आता चेंडू टाकण्याच्या वेळीच ग्लव्हज स्टम्पच्या मागे असणं आवश्यक आहे.
