प्रेयसी लग्नासाठी तगादा लावत होती, संतप्त प्रियकराने मित्राच्या मदतीने केले 35 वार

| Updated on: Jan 05, 2023 | 3:54 PM

पोलीस तपासादरम्यान महिलेजवळ तिचे आधार कार्ड सापडले. या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटवत टिटवाळा पोलिसांनी मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला.

प्रेयसी लग्नासाठी तगादा लावत होती, संतप्त प्रियकराने मित्राच्या मदतीने केले 35 वार
वारंवार लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीला संपवले
Follow us on

टिटवाळा : प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकरानेच आपल्या एका मित्राच्या मदतीने प्रेयसीवर 35 वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे उघडकीस आली आहे. रुपांजली जाधव असे या महिलेचे नाव असून ही पुणे येथे राहत होती. टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाजवळ तिचे आधार कार्ड सापडले, ज्याच्या आधारे पोलिसांनी तिची ओळख पटवली. हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. जयराज चौरे आणि सूरज घाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

टिटवाळ्यात महिलेचा मृतदेह आढळून आला होता

टिटवाळा येथील गोवेली परिसरात 12 डिसेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्राने तब्बल 35 वार करण्यात आले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

आधार कार्डच्या आधारे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली

पोलीस तपासादरम्यान महिलेजवळ तिचे आधार कार्ड सापडले. या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटवत टिटवाळा पोलिसांनी मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी या हत्याकांडाचा कसून तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

पोलीस तपासात महिलेच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली

तपासात महिलेचे नाव रुपांजली जाधव असे आहे आणि ती विवाहित असून तिला तीन मुलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच दोन वर्षांपासून रुपांजलीचे पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते अशी माहिती पोलिसांना मिळाली.

लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकरानेच संपवले

पोलिसांनी तिचा प्रियकर जयराम याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. जयराजने दिलेल्या माहितीनुसार रुपांजली त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत त्याला ब्लॅकमेल करत होती.

अखेर जयराजने रुपांजलीला संपवण्याचा निर्णय घेतला. रुपांजलीचा काटा काढण्यासाठी त्याने आपला मित्र सूरज घाटे याला सोबत घेत तिची हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी त्यांनी उल्हासनगर येथून दोन चाकू देखील खरेदी केले.

दागिने खरेदीचा बहाणा करुन टिटवाळ्यात आणत हत्या

रूपांजलीला दागिने घेऊन देतो असे सांगत तिला टिटवाळ्याला घेऊन आला. टिटवाळा येथील गोवेली परिसरात जयराज आणि त्याचा मित्र सूरज घाटे यांनी रुपांजलीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली आणि तेथून पळून गेले. अखेर टिटवाळा पोलिसांनी जयराज आणि त्याचा मित्र सूरज या दोघांना अटक केली आहे.