
सोशल मीडियात कायम चर्चेत राहणाऱ्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव झालाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना कारेगाव-कान्हूर-मेसाई गणातून तिकीट मिळालं होतं.

त्याआधी कारेगावच्या त्या सरपंचही राहिल्यायत. सोशल मीडियात निर्मला नवलेंची मोठी क्रेझ आहे.

मोठ्या संख्येनं लोक त्यांना सोशल मीडियात फॉलो करतात. मात्र सोशल मीडियावरची प्रसिद्धी आणि लोकप्रियता मतांमध्ये रुपांतरीत करु शकल्या नाहीत. त्यांच्या विरोधात मुख्य लढत भाजपच्या मनिष पाचंगेंशी होती. पाचंगेंनी निर्मला नवलेंना 300 मतांनी पराभूत केलं. हा पराभव नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही एक धक्का ठरलाय.

निर्मला नवले या मूळ पुण्यातल्या शिरुर तालुक्यातल्या आहेत. काही वर्षापूर्वी त्यांचं मूळ गाव कारेगावच्या सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत गेला. राजकारणात पाऊल ठेवूनही त्या सोशल मीडियात कायम सक्रिय राहिल्या.

सोशल मीडियात त्यांचे फॉलोवर्स मोठे असल्यानं त्यांच्या पोस्टवर हजारो लाईक्स येतात. सध्या उच्चशिक्षित तरुण राजकारणाकडे वळत नाहीत.

मात्र आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले गावच्या राजकारणात सक्रिय आहेत. गावपातळीवरुन राजकारण सुरु करुनही सोशल मीडियातल्या राजकीय वर्तुळात त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली.

उच्चशिक्षित तरुण चेहरा म्हणून त्यांचं नाव चर्चेत आल्यानं अल्पकाळातच त्यांचे सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स बनले. मात्र गावातल्या राजकारणात यश मिळालं असलं तरी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.