Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
Nepal Flood: नेपाळच्या दुर्घटनेनंतरही अभिनेत्याने त्याची यात्रा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घटनेच्या 12 ते 15 तासांपूर्वीच तो आणि त्याचे कुटुंबीय त्या परिसरात होते.

Nepal Flood: नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेदरम्यान अभिनेता अंकुर रतन थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या परिसरात काही तासांनंतर महाप्रलय आला, त्याच ठिकाणी अंकुर आणि त्याचा परिवार अवघ्या 12 ते 16 तासांपूर्वी उपस्थित होता. अंकुर रतन कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेला आहे. पत्नी शिल्पा सुचक आणि तिची चुलत बहीण सोनाली कपाडिया यांच्यासोबत तो या यात्रेत सहभागी झाला आहे. 22 ऑगस्टला काठमांडूला पोहोचल्यानंतर त्यांचा प्रवास पुढे सुरू झाला. महाराष्ट्रातील SAAD Mountaineers या नोंदणीकृत संस्थेच्या नेतृत्वाखालील 28 जणांच्या यात्रेकरूंच्या ग्रुपमध्ये तो सहभागी झाला होता.
थोडक्यात बचावले
यात्रेदरम्यान अंकुरने नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात काही तास आधी फोटोही काढले होते. त्यावेळी परिसर अगदी सामान्य दिसत होता. मात्र, त्यानंतर काही तासांतच याच भागात पाण्याचा आणि मलब्याचा प्रचंड लोंढा आला आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली. अंकुरने या थरारक अनुभवाबद्दल सांगताना तो आणि त्याचा परिवार किती जवळून या आपत्तीतून बचावले, याचा उल्लेख केला. काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी ते फिरत होते, फोटो काढत होते, तिथेच दुसऱ्या दिवशी प्रचंड विध्वंस झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे या घटनेने अंकुर आणि त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.
या अनुभवाबद्दल बोलताना अंकुरने सांगितलं की, “कैलास मानसरोवर यात्रेसाठी आम्ही सर्वजण प्रचंड उत्सुक होते. दुर्घटनेच्या फक्त एक दिवस आधी मी, माझी पत्नी आणि चुलत भाऊ याच परिसरात फोटो काढत होतो. त्यामुळे काही तासांनी त्याच ठिकाणी एवढी मोठी दुर्घटना घडेल, याची कल्पनाही आम्हाला नव्हती. माझ्या सासू डॉ. अमिता सुचक यांनी 1989 मध्ये कैलास मानसरोवर परिक्रमा पूर्ण केली होती. त्यामुळे या यात्रेला माझ्या कुटुंबासाठी आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय मला आणि माझ्या कुटुंबाला ट्रेकिंगची आवड असल्याने 52 किलोमीटरची पायी परिक्रमा पूर्ण करण्याची आम्हाला विशेष उत्सुकता होती.”
पुण्यातील वकील सुरेंद्र दातार आणि सोनल दातार हे देखील याच ग्रुपचा भाग आहेत. सोनल यांनी सांगितलं की, दुर्घटनेच्या अवघ्या सात-आठ तास आधी त्या घटनास्थळापासून फक्त 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये होत्या. त्यामुळे या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला.
या दुर्घटनेनंतरही अंकुरने त्याची यात्रा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तो मानसरोवरच्या दिशेने पुढे जात असून लवकरच कैलास पर्वताची परिक्रमा सुरू करणार आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ संपूर्ण 52 किलोमीटरची परिक्रमा पायी पूर्ण करण्याची इच्छा अंकुरने व्यक्त केली आहे. मृतांना श्रद्धांजली देण्याचा आणि त्यांच्या आठवणी आपल्या यात्रेसोबत घेऊन जाण्याचा हा नम्र प्रयत्न असेल, असं त्याने म्हटलं.