अंबानींच्या पार्टीत दिसलं आराध्या बच्चनचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले ‘5जी स्पीडने..’

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आराध्या बच्चनचा थक्क करणारा ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळाला. आराध्या ही आता नव्वदच्या दशकातील ऐश्वर्या रायसारखीच दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलंय.

अंबानींच्या पार्टीत दिसलं आराध्या बच्चनचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले 5जी स्पीडने..
आराध्या बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2024 | 8:09 AM

जामनगर : 5 मार्च 2024 | मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनला हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक छोटे-मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. सलमान खान, शाहरुख खान, गौरी खान, रणबीर कपूर-आलिया भट्ट, दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, कतरिना कैफ-विकी कौशल, जान्हवी कपूर, करीना कपूर-सैफ अली खान अशा असंख्य सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. मात्र या सर्वांत एका स्टारकिडने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ही स्टारकिड दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चन आहे. बच्चन कुटुंबीय आणि अंबानी यांचं खास नातं आहे. त्यामुळे अनंतच्या प्री-वेडिंगला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. यावेळी आराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण थक्क झाले.

याआधी आराध्या नेहमी एकाच हेअरस्टाइलमध्ये दिसली होती. बँग्सच्या हेअरस्टाइलवरून तिला अनेकदा ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं. आता आराध्या एका नव्या हेअरस्टाइलमध्ये दिसली आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता आणि आई ऐश्वर्याचा हात पकडून ती या कार्यक्रमात पोहोचली होती. या दोघींनी जेव्हा एण्ट्री केली, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. विशेषकरून आराध्याचा बदललेला अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले. कारण आराध्या या कार्यक्रमात खूपच सुंदर दिसत होती.

आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आराध्या 5जी च्या स्पीडने वाढतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘आराध्यामध्ये अचानक इतका बदल कसा झाला’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘अंबानींच्या कार्यक्रमात एक मोठं सरप्राइज मिळालं. आराध्याचं कपाळ पहायला मिळालं’, अशीही उपरोधिक कमेंट काहींनी केली. सौंदर्याच्या बाबतीत आराध्या तिच्या आईला टक्कर देत असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

आराध्याला अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत विविध कार्यक्रमांमध्ये पाहिलं जातं. त्यावरून ती शाळेत जाते की नाही, तिला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात, असा सवाल करत नेटकऱ्यांनी याआधीही ट्रोल केलं होतं. त्यावर अभिषेकने एका मुलाखतीत चोख उत्तर देत ट्रोलर्सना गप्प केलं होतं. ‘शनिवार-रविवार सगळ्या शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे कृपया या गोष्टींचा बाऊ करू नका’, असं तो म्हणाला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. ऐश्वर्याने 16 नोव्हेंबर 2011 रोजी आराध्याला जन्म दिला.

Follow Us