
प्रेक्षकांनी ‘धुरंधर’ या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेण्याआधीच निर्मात्यांनी त्याच्या सीक्वेलची तयारी केली होती. या सीक्वेलमध्ये फक्त रणवीर सिंहच्या भूमिकेची पार्श्वभूमीच नाही तर पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डमध्ये तो कशा पद्धतीने हेरगिरी करणार, हेसुद्धा दाखवण्यात येणार आहे. याच प्रेक्षकांसाठी असलेला बोनस म्हणजे अभिनेता अक्षय खन्नासुद्धा सीक्वेलमध्ये झळकणार आहे. रेहमान डकैतची कहाणी फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येणार आहे. ‘धुरंधर 2’चा बहुप्रतिक्षित टीझर ‘बॉर्डर 2’या चित्रपटासोबत थिएटरमध्ये पहायला मिळणार आहे. म्हणजेच ‘बॉर्डर 2’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेल्या प्रेक्षकांना इंटर्व्हल किंवा सुरुवातीच्या जाहिरातींदरम्यान ‘धुरंधर 2’चा टीझर पहायला मिळणार आहे. ‘बॉर्डर 2’मध्ये अभिनेता सुनील शेट्टी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. यानिमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीने ‘धुरंधर’वर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत, सुनील शेट्टीने ‘धुरंधर’चा दिग्दर्शक आदित्य धरचं तोंडभरून कौतुक केलं आहे. “आदित्यला ही गोष्ट समजून चुकली की लोकांना ओटीटीची सवय झाली आहे, त्यामुळे तो म्हणाला, तुम्हाला ओटीटी हवंय का? मग तेच मी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर दाखवतो. मी तुमच्या मोठ्या पडद्यावर चार तासांचा चित्रपट दाखवतो आणि प्रेक्षकांना हे खूप आवडलंय. चित्रपटातील कलाकारांचा परफॉर्मन्स अप्रतिम आहे. मी अक्षय खन्नाला 10 पैकी 10 गुण देतो. तो प्रतिभावान अभिनेता आहे. पण रणवीर सिंहला मी 10 पैकी 100 गुण देईन. कारण त्याने त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.”
याविषयी सुनील शेट्टीने पुढे स्पष्ट केलं, “अक्षय काम अप्रतिम आहेच, पण रणवीरने इथे खरा संयम दाखवला आहे. त्याने स्वत:ला आवरलं आणि हीच सर्वांत कठीण गोष्ट आहे. हिरो म्हणून देशभक्ती दाखवणं सोपं असतं आणि प्रेक्षक त्यावर विश्वास ठेवतात. पण दुसऱ्या देशात आपल्या मातृभूमीची ओढ वाटणं आणि तिच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगणं, हे खूप अवघड आहे. ‘धुरंधर 2’मध्ये त्याची भूमिका कशी असेल हे फक्त मी कल्पनाच करू शकतो. लेजंडरी (दिग्गज).. त्या मुलाला सलाम, विलक्षण कामगिरी!”
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट ‘केजीएफ’ स्टार यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटासोबत 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोघांची टक्कर अटळ आहे.