‘धुरंधर’मुळे सर्वांची जळाली म्हटल्याने अमिषा पटेलला लागली मिर्ची; म्हणाली “शाहरुख, सलमानने..”
'धुरंधर 2'नंतर सर्वांचीच जळाली आहे, असं म्हणणाऱ्या कॉमेडियन जाकिर खानला आता अभिनेत्री अमिषा पटेलने फटकारलं आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित तिने जाकिरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

धुरंधरच्या यशाने सर्वांचीच जळाली आहे, असं वक्तव्य कॉमेडियन जाकित खानने एका पुरस्कार सोहळ्यात केलं होतं. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या प्रचंड यशावर त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही लोकांना अप्रत्यक्ष टोमणा मारला होता. जाकिरच्या या वक्तव्यामुळे अभिनेत्री अमिषा पटेल चांगलीच भडकली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित तिने जाकिर खानला प्रत्युत्तर दिलं आहे. नकारात्मकता पसरवू नकोस, कारण हिंदी फिल्म इंडस्ट्रीने आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाला महत्त्व आणि सन्मान दिला आहे, असं तिने म्हटलंय. अमिषाने तिच्या या पोस्टमध्ये शाहरुख खान, सलमान खान, सनी देओल आणि हृतिक रोशन यांचीही उदाहरणं दिली आहेत.
अमिषा पटेलची पोस्ट-
‘मित्रा.. नकारात्मकता पसरवणं थांबव. फिल्म इंडस्ट्रीने धुरंधरला महत्त्व दिलं आहे आणि त्याचा आदरही केला आहे. शाहरुख खान, सलमान खान, सनी देओल, हृतिक रोशन, अजय देवगण यांसारख्या सुपरस्टार्सनी फक्त एक नाही तर 25 पेक्षा अधिक मेगा हिट्स दिले आहेत. भविष्यातही ते असे सुपरहिट चित्रपट करत राहतील. त्यामुळे शांत राहा. सर्वांनी बऱ्याच वर्षांपासून धुमाकूळ घातला आहे आणि पुढेही घालत राहतील’, अशा शब्दांत अमिषाने जाकिरला फटकारलं आहे.
DUDE-Stop spreading NEGATIVITY!film industry has valued n respected DHURANDHAR!Superstars like SRK,SALMAN,SUNNY , HRITHIK,AJAY et have given not just 1 but 25 plus mega hits n will continue to do so👍CHILL-GADAR bahut saalon se sabne already machai hain aur aage bhi machaayenge👍 pic.twitter.com/MqOD74LH83
— ameesha patel (@ameesha_patel) April 7, 2026
फक्त अमिषाच नाही तर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनेही जाकिर खानचं नाव न घेता त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जुहू-वांद्रेच्या लोकांनी गेल्या 50 वर्षांपासून ऑल टाइम ब्लॉकबस्टर्समध्ये आपलं योगदान दिलं आहे. त्यांच्या योगदानाला कमी लेखणं खरंच मूर्खपणा ठरेल’, असं ट्विट त्याने केलं आहे.
काय म्हणाला होता जाकिर?
“तुम्ही कितीही शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट लिहिल्या, कितीही स्टोरी पोस्ट केल्या, कितीही मुलाखतीत सांगा की हा माझा आवडता चित्रपट आहे, परंतु सत्य हेच आहे की धुरंधरमुळे सर्वांचीच जळाली आहे. बम फिल्म में फुटे ल्यारी में पर धुआं उडा है ब्रांदा से जुहू में (चित्रपटात ल्यारीमध्ये बॉम्ब फुटले आहेत, पण त्याचा धूर वांद्र्यापासून जुहूपर्यंत पोहोचला आहे.)”, असं तो मंचावर सर्वांसमोर म्हणाला होता.