धुरंधर 2, भूत बंगलाच्या यशादरम्यान अभिषेक बच्चनच्या या चित्रपटाने कमावले 100 कोटी

रणवीर सिंहच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' आणि अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या दोन्ही चित्रपटांच्या यशादरम्यान अभिषेक बच्चनचा एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्याने आतापर्यंत कमाईचा 100 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे.

धुरंधर 2, भूत बंगलाच्या यशादरम्यान अभिषेक बच्चनच्या या चित्रपटाने कमावले 100 कोटी
भूत बंगला, धुरंधर 2
Image Credit source: Instagram
| Updated on: May 20, 2026 | 11:12 AM

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचाच बोलबाला होता. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास महिनाभर इतर निर्मात्यांनी चित्रपट पुढे ढकलले होते. महिनाभरानंतर अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या हॉरर कॉमेडी चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या दोन्ही चित्रपटांच्या यशादरम्यान अभिनेता अभिषेक बच्चनचा एक असा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

अभिषेक बच्चनचा हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून ‘राजा शिवाजी’ आहे. रितेश देशमुखने या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये अभिषेकने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभिषेकच्या करिअरमधील हा पहिलाच ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात मराठी आणि हिंदी कलाविश्वातील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळते. या चित्रपटाने गेल्या 19 दिवसांत 100 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे मराठी व्हर्जनमधील चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय.

रितेशच्या या चित्रपटात पहिल्यांदाच अभिषेक बच्चन आणि सलमान खान एकत्र आले आहेत. जरी हे दोघं एका फ्रेममध्ये दिसले नसले तरी त्यांनी एकाच चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये सलमानने जिवा महालाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे ‘राजा शिवाजी’मध्ये भूमिका साकारण्यासाठी सलमाननेच रितेशकडे आग्रह धरला होता. रितेशच्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम आहे.

या चित्रपटात रितेशनेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांनीसुद्धा विविध भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात रितेशच्या दोन्ही मुलांनीही विविध टप्प्यांमधील बाल शिवरायांची भूमिका साकारली आहे. ‘राजा शिवाजी’ हा रितेशच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या चित्रपटावर तो गेल्या दहा वर्षांपासून काम करत होता. सुरुवातीला रवी जाधव आणि नागराज मंजुळे हे दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होते, परंतु काही कारणास्तव दोघांनाही ते शक्य झालं नाही. अखेर रितेशनेच दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

Follow Us