शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटावरून वादादरम्यान अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 16, 2022 | 8:58 AM

"आताही उपस्थित केले जातात प्रश्न"; अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य चर्चेत

शाहरुखच्या पठाण चित्रपटावरून वादादरम्यान अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य
Amitabh Bachchan
Image Credit source: Twitter
Follow us on

कोलकाता: कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधल्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्कार केला. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल ममता यांनी बिग बींचे आभार मानले. तर यावेळी भाषणादरम्यान बिग बींनी काही मोठे मुद्दे मांडले. त्यांच्या भाषणातील मुद्दे सध्या चर्चेत आले आहेत. सिनेमाचा विकास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल ते व्यक्त झाले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उपस्थित केले प्रश्न

अमिताभ बच्चन यांनी फेस्टिव्हलमध्ये ब्रिटिश सेन्सॉरशिप, छळ करणाऱ्यांविरोधात स्वातंत्र्यापूर्वीचे चित्रपट, सांप्रदायिकता आणि सामाजिक एकता यांच्यावर सविस्तर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं. “मला विश्वास आहे की मंचावर बसलेले माझे सहकारी याच्याशी सहमत असतील की आतासुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत”, असं ते म्हणाले.

“चित्रपटाच्या कंटेटमध्ये आता बरेच बदल पहायला मिळतात. आता विविध विषयांना हात लावला जातो. पौराणिक चित्रपटांपासून ते आर्ट हाऊस, अँग्री यंगमॅन आणि काल्पनिक अंधराष्ट्रवाद यांसारखे अनेक विषय आहेत. या विषयांवर सिंगल स्क्रीन आणि ओटीटीच्या माध्यमातून विचार मांडले जातात”, असंही मत बिग बींनी मांडलं.

हे सुद्धा वाचा

प्रेक्षकांविषयी ते पुढे म्हणाले, “आपण प्रेक्षकांना कमी लेखू शकत नाही. त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारचा कंटेट असतो. त्यांना तो कंटेट पाहायची इच्छा असते आणि ती त्यांची मर्जी आहे.”

विशेष म्हणजे सध्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा वाद सुरू असताना बिग बींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत शाहरुख खानसुद्धा उपस्थित होता.

काय म्हणाला शाहरुख?

“हे जग आता नॉर्मल झालंय. सर्वजण खुश आहेत. मी सर्वाधिक खुश आहे आणि हे सांगण्यात मला कोणतीही समस्या नाही की जगाने काहीही केलं तरी, मी, तुम्ही लोकं आणि जगात जितकेही सकारात्मक लोक आहेत, ते जिवंत आहेत”, असं तो या कार्यक्रमात म्हणाला.