नीट पेपरफुटीप्रकरणी चकार शब्द नाही अन् आता..; अमिताभ बच्चन यांच्यावर नेटकरी संतापले
अमिताभ बच्चन यांनी 7 जून रोजी मध्यरात्री 2.12 वाजता एक्स (ट्विटर) अकाऊंटवर अशी पोस्ट केली, जे पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला. नेटकऱ्यांनी त्यांना महागाई आणि नीट पेपरफुटीवरून सवाल केला, तर काहींनी थेट त्यांना 'नकली हिरा' असं म्हटलंय.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे एक्स (ट्विटर), फेसबुक आणि ब्लॉगवर सतत काही ना काही लिहित असतात. त्यांच्या या पोस्टवर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत असतात. मात्र नुकतीच त्यांनी अशी पोस्ट लिहिली आहे, ज्यावरून नेटकरी त्यांच्यावर संतापले आहेत. देशातील महागाई आणि नीट पेपरफुटी प्रकरणावरून नेटकऱ्यांनी त्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. तर काहींनी थेट बिग बींना ‘नकली हिरा’ म्हणत त्यांच्या मौनावर जोरदार टीका केली. 83 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी 7 जूनच्या रात्री 2.12 वाजता हिऱ्याबद्दल एक पोस्ट लिहिली. याच पोस्टवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
‘हिरा दुर्मिळ किंवा असामान्य असल्यामुळे महाग नसतो, तर तो मिळवणं (शोधणं) खूप कठीण असल्यामुळे महाग असतो’, अशा आशयाची पोस्ट बिग बींनी लिहिली होती. नेहमीप्रमाणे त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, मात्र यावेळी अनेकांनी त्यांच्यावरच संताप व्यक्त केला. अमिताभ बच्चन हे क्षुल्लक बाबींवर लिहितात, पण महत्त्वाच्या विषयांवर गप्प का राहतात, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. नीट पेपरफुटीपासून ते विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांपर्यंत किंवा पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीपर्यंत त्यांनी कशावरही मौन सोडलं नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
@SrBachchan हीरे की तरह जीवन भी कीमती है, NEET पेपर लीक में अब तक 6 बच्चो ने सुसाइड की है… और अपने एक शब्द नहीं बोला इस पे ……अफसोस होता है कि फ़िल्मों में अन्याय न सहने के किरदार करने के बावजूद …आप बच्चों, यूथ पे हो रहे अन्याय पे चुप हैं…..उमीद है sir, आप रिप्लाई देंगे
— K .K (@kashish56294388) June 6, 2026
और पेट्रोल भी बहुत महंगा है पर आप बोलते ही नहीं, मुँह में दही जम गया है 😅🤣
— Rajneesh Bahl (@OnelinerBadshah) June 6, 2026
‘सर, आयुष्यही हिऱ्यासारखंच मौल्यवान आहे. नीट पेपरफुटीमुळे आतापर्यंत सहा मुलांनी आत्महत्या केली आणि तुम्ही चकार शब्दही काढला नाही. चित्रपटांमध्ये अन्याय सहन न करण्याची भूमिका साकारूनही तुम्ही लहान मुलांवर आणि तरुणांवर होणाऱ्या अन्यायावर गप्प आहात, हे खेदाची बाब आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘लहानपणी कोणीतरी आम्हाला या देशाचं भविष्य म्हटलं होतं, पण प्रत्यक्षात आम्ही दगडच ठरलो’, अशीही उपरोधित पोस्ट दुसऱ्या युजरने लिहिली. आणखी एकाने कमेंट करत म्हटलंय, ‘तुम्हालाही एक दुर्मिळ हिरा मानलं जात होतं सर, पण आज आम्हाला कळलंय की तुम्ही किती ढोंगी आहात.’
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असले तरी चालू घडामोडी किंवा देशातील प्रश्नांवर, समस्यांवर, राजकीय मुद्द्यांवर ते सहसा कधीच मतं मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता संतप्त नेटकऱ्यांनी त्यांना सवाल केला आहे.