Amitabh Bachchan : एवढी हिंमत? त्या दिग्दर्शकाने थेट अमिताभ बच्चन यांनाच घरी पाठवलं; थेट अभिनयावरून…
आज महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा प्रवास कधीच सोपा नव्हता. केबीसीच्या मंचावर त्यांनी आपल्या सुरुवातीच्या संघर्षाचे खुलासे केले. उंचीमुळे नकार, अभिनयावर टीका, दिग्दर्शकांकडून ओरडा आणि एका चुकीमुळे थेट चित्रपटातून बाहेर काढल्याचा प्रसंग त्यांनी सांगितला. यशामागे दडलेला त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना धक्का देणारा आहे.

मनाचा ठाव घेणारा धीरगंभीर आवाज, बोलके डोळे आणि खणखणीत अभिनय या जोरावर गेल्या कित्येक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करणारे, वयाच्या 80 व्या वर्षानंतरही अविरत काम करणारे अभिनेते – अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). आज लाखो लोकं त्यांचे चाहते आहेत, पण तरी सुरूवातीच्या काळात अमिताभ यांनाही बरीच मेहनत करावी लागली, काही वेळा रिजेक्शन, नकारही सहन करावा लागला, प्रचंड संघर्षही त्यांनी केला. याचा खुलासा खुद्द बिग बी यांनी केला, तो ‘कौन बनेगा करोड़पति 18’ च्या मंचावर. लेटेस्ट भागात अमिताभ बच्चन यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 ची गोल्ड मेडलिस्ट लवलीना, जसवंत कुमार, शर्मिला धनकर आणि अस्मिता डे यांच्याशी खास संवाद साधला. गप्पा मारता मारता त्यांनी सुरूवातीच्या काळात जो संघर्ष सहन करावा लागला, त्याबद्दलही सांगितलं.
आज बॉलिवूडचे ‘महानायक’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना बऱ्याच वेळा नकार, टीका आणि अपमानाचा सामना करावा लागला. एवढंच नव्हे, तर उंचीमुळेही त्यांना ऐकून घ्यावं लागलं होतं. “तुम्ही खूप उंच आहात, अभिनेता होऊ शकत नाही” असंही त्यांना सुनावण्यात आलं होतं. प्रशिक्षणादरम्यान चूक झाल्यावर जसा खेळाडूंना प्रशिक्षकांकडून ओरडा मिळतो, तसाट कलाकारांनाही सेटवर दिग्दर्शकांकडून ओरडा खावा लागतो का? असा प्रश्न या शोमध्ये सहभागी झालेल्या अस्मिताने अमिताभ बच्चन यांना विचारला.
अमिताभ बच्चन यांना खावा लागला ओरडा
त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच अवाक् झाले. बिग बींनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांचा एक किस्सा सांगितला. ‘मला देखील सुरुवातीच्या काळात खूप ओरडा खावा लागला. लोक माझ्या अभिनयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे’. असं ते म्हणाले. ‘ तुला अभिनय वगैरे काहीच येत नाही, तू खूप उंच आहेस, घरी जा,’ अशा शब्दांत माझ्यावर टीका करण्यात आली होती, असं अमिताभ यांनी नमूद केलं.
एका चुकीमुळे थेट चित्रपटातून बाहेर !
यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील आणखी एक धक्कादायक प्रसंगही सांगितला. एकदा त्यांना एका चित्रपटाच्या सेटवर पोहोचायला थोडा उशीर झाला होता. त्या काळात त्यांच्याकडे स्वतःची गाडीही नव्हती, त्यामुळे ते दुसऱ्याची गाडी घेऊन सेटवर पोहोचले होते. पण सेटवर जाताच पाहिलं तर काय, दिग्दर्शक चांगलेच संतापले होते. एवढंच नव्हे तर त्यांनी अमिताभ बच्चन यांना थेट चित्रपटातूनच बाहेरचा रस्ता दाखवला ! असा किस्सा त्यांनी सांगितला. खरंतर, आज लाखो चाहते, अमिताभ यांच्या एका लूकसाठी, त्यांची एक झलक पाहता यावी प्रचंड उत्सुक असतात, त्याच महानायकाला करिअरच्या सुरुवातीला अशा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता.
व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून सुरू केलं काम
बऱ्याच लोकांना हे माहीतही नसेल पण अमिताभ बच्चन यांनी पहिले अभिनेता म्हणून नव्हे तर व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम सुरू केलं, अशा तऱ्हेने त्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध आला होता. 1969 मध्ये त्यांनी मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ या चित्रपटासाठी आपल्या दमदार आणि भारदस्त आवाजात व्हॉइस-ओव्हर दिला होता.