राज ठाकरेंच्या दिवाळी पार्टीत अर्जुन कपूरने केला ‘रिलेशनशिप स्टेटस’चा खुलासा, पहा व्हिडीओ

अभिनेत्री मलायका अरोरासोबतच्या नात्याबद्दल अखेर अर्जुन कपूरने खुलासा केला आहे. राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत अर्जुनने सर्वांसमोरच रिलेशनशिप स्टेटस जाहीर केलं. अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राज ठाकरेंच्या दिवाळी पार्टीत अर्जुन कपूरने केला रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा, पहा व्हिडीओ
Malaika Arora and Arjun Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 29, 2024 | 10:03 AM

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्रेकअपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा अर्जुन आणि मलायका हे सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे पोस्ट लिहित होते. मात्र आता पहिल्यांदाच अर्जुन त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे. अर्जुन मुंबईतील एका दिवाळी पार्टीत पोहोचला होता. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी पार्टीत तो ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगण, टायगर श्रॉफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांसारख्या कलाकारांसोबत पोहोचला होता. यावेळी गर्दीतून चाहत्यांनी जेव्हा मलायकाचं नाव घेतलं, तेव्हा अर्जुनने ‘मी सिंगल आहे’ असं स्पष्ट केलं.

या कार्यक्रमात अर्जुनने बोलण्यासाठी मायक्रोफोन हातात घेतला, इतक्यात चाहत्यांच्या गर्दीतून मलायकाच्या नावाची घोषणा होऊ लागली. त्यावर प्रतिक्रिया देताना अर्जुन म्हणाला, “आता सिंगल आहे मी, रिलॅक्स. त्यांनी मला उंच आणि हँडसम असं म्हटलंय आणि तुम्हाला वाटलं की ते माझ्या लग्नाबद्दल बोलतायत.” ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन पहिल्यांदाच त्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी इतक्या खुलेपणाने व्यक्त झाला. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर 2018 पासून मलायका अर्जुनला डेट करू लागली. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं. वयातील अंतरावरून दोघांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र या ट्रोलिंगलाही न जुमानता त्यांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानही अर्जुनने मलायकाच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीत तिची साथ दिली. सप्टेंबर महिन्यात मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी मलायकाचं सांत्वन करण्यासाठी अर्जुन पोहोचला होता. मलायकासोबत पुन्हा पाहून नेटकऱ्यांनी दोघांच्या पॅचअपची शक्यता वर्तवली होती. मात्र अर्जुनने आता सिंगल असल्याचा खुलासा केल्याने मलायकासोबतच्या नात्याला पूर्णविराम मिळालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करूनही कोणत्याच गोष्टीचा पश्चात्ताप नसल्याचं मलायकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. “माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाने मला घडवलं आहे. मी कोणत्याच पश्चात्तापाशिवाय जगते आणि ज्याप्रकारे गोष्टी घडल्या त्यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते”, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.

Follow Us