Asha Bhosle : आशा भोसले काळाच्या पडद्याआड, कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार ?
महान गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. ७ दशके आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या आशाताईंच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पिया तू अब तो आजा सारखं उडत्या चालीचं गाणं असो की जिवलगा राहीले रे हे गीत किंवा मागे उभा मंगेश हे गाणं असो…. कोणतंही गाणं लीलया पेलण्याची आणि तितक्याच ताकदीने निभावून नेण्याची खुबी असलेल्या, लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आपलासा वाटणारा आवाज म्हणजे…. आशा भोसले (Asha Bhosale). गेल्या 7 दशकांहून अथक काळ आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही चिरतरूण गायिका.. वयाच्या 93 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने काल त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांनी आज (12 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगलीत त्यांचा जन्म झाला. अखेर आज मुंबईतील रुग्णायलयात त्यांचं निधन झालं.
थोड्यावेळापूर्वी आशा भोसले यांचा मुलगा, आनंद भोसले यांनी आशाताईंच्या जाण्याची दु:खद बातमी सर्वांसमोर सांगितली. यावेळी त्यांच्यासोबत आशिष शेलारही उपस्थित होते. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे आशा भोसले यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता असंही डॉक्टरांनी नमूद केलं.
कुठे होणार अंत्यसंस्कार?
यावेळी आशिष शेलार यांनी पुढील माहिती दिली. ” आशाताई आपल्यात राहिल्या नाही. कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल प्रक्रिया, फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. लोअर परळला त्यांचं निवासस्थान आहे. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 पर्यंत त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. नंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल आहे”, असं ते म्हणाले. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील असंही त्यांनी नमूद केलं.
“आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुखात बुडाला. एका युगाचा अंत झाला. आशाताई आपल्यातून निघून गेल्या. त्या असणं समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं आयुष्य आणि प्रवास दुखाला कवटाळून दुसऱ्याला सुख देण्याचा मार्ग होतं. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. संगीत क्षेत्रातील कर्तृत्व जगाला देणं आहे” अशा शब्दांत आशिष शेलार यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.