Kiara Advani | कियारा अडवाणीमुळे ‘शार्क टँक इंडिया’ फेम परीक्षकाचा होणार होता घटस्फोट; वाचा नेमकं काय घडलं?

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान आता प्रसिद्ध 'शार्क टँक इंडिया' या शोमधील एका परीक्षकाच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट आहे 'भारत पे' कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवर यांची.

Kiara Advani | कियारा अडवाणीमुळे शार्क टँक इंडिया फेम परीक्षकाचा होणार होता घटस्फोट; वाचा नेमकं काय घडलं?
Kiara Advani | कियारा अडवाणीमुळे 'शार्क टँक इंडिया' फेम परीक्षकाचा होणार होता घटस्फोट
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 05, 2023 | 12:41 PM

मुंबई: अभिनेत्री कियारा अडवाणी ही बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राशी येत्या 6 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान आता प्रसिद्ध ‘शार्क टँक इंडिया’ या शोमधील एका परीक्षकाच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट आहे ‘भारत पे’ कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवर यांची. अश्नीर यांनी कियारा अडवाणीचा यामध्ये उल्लेख केल्याने त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर कियारामुळे त्यांचा त्यांच्या पत्नीशी घटस्फोट होणार होता, असंही त्यांनी म्हटलंय.

अश्नीर यांच्या ‘दोगलापन’ या आत्मचरित्रात हा किस्सा सांगण्यात आला आहे. ज्यामध्ये कियारामुळे पत्नी माधुरीशी घटस्फोट होणार होता, असं त्यांनी म्हटलंय. ट्विटरवर सध्या त्यांच्या आत्मचरित्रातील ही पानं व्हायरल होत आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

अश्नीर हे त्यांच्या एका मित्राला भेटले होते, ज्याने नुकताच नवीन व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी दोघं मिळून मित्राच्या लग्नाच्या प्लॅनिंगची चर्चा करत होते. ग्रोवर यांचा मित्र एका सेलिब्रिटी मॅचमेकरला भेटला होता आणि कियारा अडवाणी ही त्याची ‘आयडियल मॅच’ असल्याचंही त्याने अश्नीरला सांगितलं होतं. यावरून अश्नीर यांना त्यांच्या आईसोबतचा एक संवाद आठवला.

अश्नीर यांची आई जेव्हा त्यांची मस्करी करत होती तेव्हा ते आईला म्हणाले, “तुम्हाला माहीत नाही आजकाल मार्केटमध्ये काय चाललंय? आजच्या काळात जर माझं लग्न झालं असतं ना तर कियारा अडवाणीचं स्थळ तुमच्या मुलासाठी आलं असतं.” याच संवादामुळे अश्नीरची पत्नी माधुरी त्यांच्यावर खूप नाराज झाली आणि बरेच तास त्यांच्याशी बोलत नव्हती.

“तुम्हाला कियारा अडवाणीशी लग्न करायचं आहे का”, असा पत्नी त्यांच्या पत्नीने रागात विचारला. इतकंच नव्हे तर जेव्हा अश्नीर संघर्ष करत होते, तेव्हा त्यांची कशी साथ दिली, याचीही आठवण पत्नीने त्यांना करून दिली. अश्नीरने हा किस्सा शार्क टँक इंडियामधील इतर परीक्षकांनाही सांगितला होता. त्यानंतर अनेकदा शोमध्ये इतर परीक्षकांनी अश्नीर यांची कियारा अडवाणीवरून खिल्लीसुद्धा उडवली होती.

अश्नीर हे शार्क टँक इंडिया या लोकप्रिय कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये परीक्षक होते. मात्र दुसऱ्या सिझनमध्ये त्यांनी भाग घेतला नाही.