Ajay Devgn: “माझ्याही संसारात चढउतार आहेत, मतभेद आहेत, पण..”; काजोलबाबत व्यक्त झाला अजय देवगण

| Updated on: Apr 28, 2022 | 9:36 AM

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. परस्परविरोधी स्वभाव असणाऱ्या या दोघांनी 1999 मध्ये लग्नगाठ बांधली. 1995 मध्ये 'हलचल' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

Ajay Devgn: माझ्याही संसारात चढउतार आहेत, मतभेद आहेत, पण..; काजोलबाबत व्यक्त झाला अजय देवगण
Ajay Devgn and Kajol
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. परस्परविरोधी स्वभाव असणाऱ्या या दोघांनी 1999 मध्ये लग्नगाठ बांधली. 1995 मध्ये ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले होते. आजपर्यंत या दोघांनी ‘इश्क’, ‘दिल क्या करे’, ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘गुंडाराज’, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. 2003 मध्ये काजोलने न्यासाला तर 2010 मध्ये युगला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजय त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल (marriage) व्यक्त झाला. संसारात अनेकदा चढउतार आल्याची कबुली त्याने यावेळी दिली.

रणवीर अलाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत अजय म्हणाला, “आमचं लग्न खूप चांगल्याप्रकारे टिकून राहिलंय. पण आमच्याही संसारात चढउतार आहेत. मतभेद आहेत, पण तुम्हाला ते मॅनेज करता आलं पाहिजे, कारण सर्वांची मनं एकसारखी नसतात. मुलांचाही विचार करावा लागतो. दोन डोकं वेगळ्या पद्धतीने विचार करतात. पण काय योग्य आणि काय अयोग्य आहे याचा विचार करून त्यानुसार निर्णय घेता येतात. तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे, हेसुद्धा समजून घ्यावं लागतं. यात सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या चुका खुल्या मनाने स्वीकारायला शिका. जिथे तुम्ही चुकता तिथे माफी मागून पुढे निघून जा. तुम्ही अहंकाराला जपलात तर काही गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत.”

“मला लोकांची खूप काळजी असते. पण ही काळजी दाखवण्याचा माझा वेगळा मार्ग आहे. मी सतत ते तुम्हाला समोर बोलून दाखवू शकत नाही. प्रेम हे भागीदारी, जबाबदारी आणि काळजीमध्ये रूपांतरित जेव्हा होते, तेव्हा ते प्रेमापेक्षा अधिक मजबूत असते. कारण केवळ प्रेम तुम्हाला जगायला शिकवू शकत नाही”, असंही तो पुढे म्हणाला.

अजयने 1991 मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा ‘रनवे 34’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह, अमिताभ बच्चन आणि बोमन इराणी यांच्या भूमिका आहेत.