मंगळसूत्र घातलं, कुंकू भरलं.., राजेश खन्ना यांच्याशी लग्नाचा दावा; एक्स गर्लफ्रेंडला कोर्टाचा मोठा झटका
अनिता अडवाणी यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी त्यांनी कोर्टात धाव घेतली असून गेल्या आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडली. अनिता अडवाणी आणि राजेश खन्ना यांचं नातं जगजाहीर होतं.

दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतच्या आपल्या नात्याला ‘विवाह’ म्हणून मान्यता मिळावी यासाठी अनिता अडवाणी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु याप्रकरणी त्यांना कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने दिंडोशी दिवाणी न्यायालयाचा 2017 चा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांनी मांडलेले युक्तिवादही न्यायाधीशांनी ऐकले. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला. अनिता अडवाणी यांनी असा दावा केला होता की त्यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं होतं.
अनिता अडवाणी यांचा दावा
एका मुलाखतीत अनिता यांनी सांगितलं होतं की, घरातील मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं होतं. त्यावेळी राजेश खन्ना यांनी त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालत, भांगेत कुंकू भरत आपली पत्नी म्हणून स्वीकार केल्याचा दावा अनिता यांनी केला होता. चित्रपटसृष्टीत वैयक्तिक संबंध सार्वजनिक करणं तितकं सोपं नाही, त्यामुळे या खाजगी लग्नाची घोषणा कधीच केली नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर अनिता यांनी राजेश खन्ना यांच्यावर कौटुंबिक हिंसेचाही आरोप केला होता.
डिंपल कपाडिया, ट्विंकल-अक्षयला दिलासा
कोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केलं की, अनिता अडवाणी यांचं अपील स्वीकारलं जाऊ शकत नाही. या निर्णयामुळे डिंपल कपाडिया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण ते सुरुवातीपासूनच अनिता यांच्या दाव्यांना विरोध करत होते. याआधी कनिष्ठ न्यायालयानेही तांत्रिक कारणांवरून अनिता यांचा खटला फेटाळला होता.
राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिप
अनिता अडवाणी आणि राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांमधील हा वाद खूप जुना आहे. 2017 मध्ये दिंडोशी न्यायालयाने तांत्रिक कारणं देत अनिता यांची केस फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या आठवड्यात या प्रकरणाची अंतिम सुनावणी पार पडली. अनिता यांनी असाही आरोप केला होता की, राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची काळजी घेतली नव्हती. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहिल्याचा दावा अनिता यांनी केला होता. परंतु त्यांच्या अंत्यविधीतून वगळण्यात आल्यावर त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं होतं. अनिता यांनी सांगितलं की, त्या राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्यावर लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहत होत्या. या दोघांचं नातं जवळपास 12 वर्षे होतं.
अनिता यांनी आरोप केला होता की राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना घरातून बळजबरीने बाहेर काढलं होतं. परंतु 2015 मध्ये उच्च न्यायालयाने डिंपल कपाडिया आणि अक्षय कुमार यांच्यावरील कौटुंबिक हिंसाचाराचा खटला फेटाळून लावला होता. कायदेशीररित्या डिंपल कपाडिया याच राजेश खन्ना यांच्या पत्नी राहिल्या, कारण त्यांनी कधीच औपचारिक घटस्फोट घेतला नव्हता.