राजेश खन्ना यांच्याशी नातं, तरीही संपत्तीतून एक रुपया मिळाला नाही; वादावर अखेर सोडलं मौन
सत्तरच्या दशकात राजेश खन्ना यांनी हा बंगला विकत घेतला होता. 'आशीर्वाद' हा बंगला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या बंगल्याबाबत आणि राजेश खन्ना यांच्या मृत्यूपत्राबाबत अभिनेत्री काय म्हणाली, ते सविस्तर वाचा..

बॉलिवूडचे ‘काका’ अर्थात सुपरस्टार राजेश खन्ना त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकायचे. सत्तरच्या दशकात त्यांचं प्रचंड स्टारडम होतं. जेव्हा ते स्क्रीनवर यायचे, तेव्हा थिएटरमध्ये अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. परंतु 2012 मध्ये त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. राजेश खन्ना हे त्यांच्या चित्रपटांमुळे जेवढे चर्चेत होते, तेवढेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होते. डिंपल कपाडियासोबत त्यांचं लग्न, घटस्फोट आणि अभिनेत्री अनिता अडवाणीसोबतचं नातं हे जगजाहीर आहे. परंतु राजेश खन्ना यांच्या प्रॉपर्टीवरून झालेला वाद फार कमी लोकांना माहीत असेल. त्यांच्या निधनानंतर अनिता अडवाणी आणि डिंपल कपाडिया यांच्या कुटुंबीयांमध्ये संपत्तीवरून वाद सुरु झाला होता. हा वाद उच्च न्यायालयात सोडवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.
अनीताने याआधीही या वादावर प्रतिक्रिया दिली होती. राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांना त्यांची संपूर्ण संपत्ती मिळाली. परंतु मला काहीच मिळालं नाही, असा खुलासा तिने केला होता. इतकंच नव्हे तर राजेश खन्ना यांचं मृत्यूपत्रसुद्धा दाखवलं गेलं नसल्याची तक्रार अनिताने केली होती. आता विक्की लालवानीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनिता म्हणाली, “मला तसंच आयुष्य जगायचं आहे, जसं मी आधीपासून जगत होते. तो बंगला तर परत येऊ शकत नाही, त्यामुळे मला आता आदरपूर्वक आयुष्य जगायचं आहे. मी कधीच मृत्यूपत्र पाहिलं नाही. परंतु मला माहीत होतं की सर्वांसाठी बरंच काही त्यात होतं. ही फक्त पैशांची गोष्ट नाही. ही माझ्या प्रतिष्ठेचीही बाब आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, मी आधी जशी होती, मला तसंच राहायचं आहे. मला तसं करण्याचा पूर्ण अधिकार आहे.”
राजेश खन्ना यांच्या निधनापर्यंत अनिता अडवाणी त्यांच्यासोबत होती. या दोघांचं नातं जवळपास 12 वर्षे होतं. या मुलाखतीत अनिताने असाही खुलासा केला की तिने राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर एक पुस्तकसुद्धा लिहिलं होतं. एका लोकप्रिय प्रकाशकांकडून तो पुस्तक प्रकाशितसुद्धा केला होता. परंतु प्रकाशनादरम्यान त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अनिताने असंही सांगितलं की त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या भागात छेडछाड करण्यात आली होती.
