सत्तेतल्या लोकांच्या मित्रांनाच..; राष्ट्रीय पुरस्कारांवरून अभिनेत्याने थेट साधला निशाणा
राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेनंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्तेतल्या लोकांच्या मित्रांना आणि कुटुंबीयांनाच हे पुरस्कार जाहीर झाले, असा थेट आरोप या अभिनेत्याने केला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची प्रतीक्षा प्रत्येक कलाकाराला असते. त्या विजयात आपल्या चित्रपटाचा सन्मान होताना पाहणं अनेकांचं स्वप्न असतं. नुकतीच 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली, यामध्ये अनेक दमदार चित्रपटांना आणि कलाकारांना पुरस्कार मिळाले. मात्र मल्याळम अभिनेते चंदू सलीम कुमार यांनी त्यांच्या सुपरहिट ‘मंजुम्मेल बॉइज’ या चित्रपटाला पुरस्कार न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ‘मंजुम्मेल बॉइज’ या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सर्वोत्तम चित्रपटांमध्ये याची गणना केली जाते. मात्र तरीही राष्ट्रीय पुरस्काराला मुकल्याने अभिनेत्याने नाराजी बोलून दाखवली आहे.
चंदूने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘2050 व्या वर्षात जेव्हा एखादा मुलगा भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटांची यादी पाहील, तेव्हा त्याला फक्त तेच चित्रपट दिसतील. मात्र त्यावेळी देशात कोणत्या प्रकारचं सरकार होतं, हे त्याला माहीत नसेल. तो फक्त त्या यादीच्या आधारावरच चित्रपटांचं मूल्यमापन करेल. जर त्याला असं आढळलं की अनेक सामान्य दर्जाच्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले आणि अनेक चांगल्या चित्रपटांकडे दुर्लक्ष केलं गेलं, तर तो नक्कीच प्रश्न उपस्थित करेल.’
पहा पोस्ट-
View this post on Instagram
या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘लोक उत्तर देतील की हा पुरस्कार प्रतिभेसाठी किंवा कथेसाठी नाही, तर सत्तेसाठी होता. ट्रॉफी नेहमीच असेल, पण तुम्हाला ती कशी मिळाली, हा प्रश्न नेहमीच उपस्थित राहील. पुरस्कार कोणत्याही सरकारपेक्षा मोठे असले पाहिजेत, जिथे कला आणि कामाचा पुरावा मिळाला पाहिजे. जर लोकांचा यावरील विश्वास उडाला, तर लोक त्यांच्या काळातील चित्रपटांना सर्वोत्तम मानणार नाहीत.’ चंदूने त्याच्या या पोस्टमध्ये ‘मंजुम्मेल बॉइज’चा उल्लेख केला नसला तरी त्याचा इशारा त्याकडेच असल्याचं म्हटलं जातंय.
यावेळी चंदूने दिग्गज अभिनेते मम्मूटी यांची मात्र प्रशंसा केली. त्यांचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘सत्तेतील लोकांच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये मम्मूटी यांनी हा सन्मान आपल्या प्रतिभेच्या जोरावर मिळवला आहे. चित्रपटातील त्यांचा अभिनय इतका अप्रतिम होता की त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.’ मम्मूटी यांना यावर्षी त्यांच्या ‘ब्रह्मयुगम’ या चित्रपटासाठी चौथा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता कार्तिक आर्यनलाही ‘चंदू चॅम्पियन’साठी पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपटाचा पुरस्कार ‘फेमिनिची फातिमा’ला, ‘ब्रह्मयुगम’ला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार जाहीर झाला.
