Kangana Ranaut: जेन-झींना ‘गटरछाप’ म्हटल्याने कंगना यांना मारहाण? व्हिडीओमागील सत्य समोर
Kangana Ranaut : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांना मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेन-झींना गटरछाप म्हटल्याने त्यांच्यावर संतप्त लोकांना हल्ला केल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत या नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या जेन-झींना ‘गटरछाप’ म्हटल्याने त्यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. कंगना यांच्या अशा वक्तव्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यावर घोळक्याने हल्ला केल्याचं दिसतंय. जेन-झींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगना यांच्यावर हा हल्ला झाल्याचं या व्हिडीओत म्हटलं गेलंय.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक महिला गाडीतून बाहेर पडत असताना जमाव तिच्यावर हल्ला करतो. गाडीबाहेर पाऊल ठेवताच तिथे उपस्थित असलेले लोक तिला मारहाण करू लागतात आणि तिचे केस ओढतात. मात्र या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे. या व्हिडीओमधील महिला कंगना राणौत नसून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या प्रणयिता दास आहेत. 30 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथल्या कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता.
पहा व्हिडीओ-
‘द टेलिग्राफच्या’ 31 जुलैच्या वृत्तामध्येही व्हायरल व्हिडीओमधील एका स्क्रीनशॉटचा वापर करण्यात आला होता. त्यानुसार, पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराप्रकरणी प्रणयिता दास या 30 जुलै रोजी जलपाईगुडी इथल्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली आणि पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. सीजेपी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगना राणौत यांना मारहाण झाल्याचं कोणतंही वृत्त समोर आलं नाही. यावरून स्पष्ट होत आहे की, व्हायरल व्हिडीओमधील हा दावा खोटा आहे.
कंगना यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या जेन-झी आंदोलकांना ‘जनरेशन गटर’ असं म्हटलं होतं. “जनरेशन झेडच्या महिला या पाश्चात्य संस्कृती स्वीकारलेल्या भारतीय महिला आहेत. त्या अभ्यासात कुशल नाहीत. त्या इतक्या कुरुप आणि भ्रष्ट आहेत की त्यांना घरकामसुद्धा सांभाळता येत नाही. तरीही त्या अमली पदार्थांचं सेवन करण्याचं, दारू पिण्याचं किंवा अनेक व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य अभिमानाने मिरवतात”, अशी टीका कंगना यांनी केली होती.